आरंभ मराठी | धाराशिव
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर धाराशिव जिल्ह्यातील पक्ष संघटनेत मोठ्या बदलांना सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या केंद्रीय कार्यालयाकडून धाराशिव जिल्ह्याची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून, शिवसेना उबाठा गटातील अनेक पक्ष प्रवेश शिवसेनेत होणार असल्याने या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात शिवसेनेत विविध गट निर्माण झाल्याने संघटनात्मक पातळीवर मतभेद वाढले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख पदात करण्यात आलेल्या बदलांनंतर अंतर्गत वाद अधिक तीव्र झाले होते. काही दिवसांपूर्वी जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या निवासस्थानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीतच पक्षातील पदाधिकारी एकमेकांना भिडले होते.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या प्रवेशानंतर पक्ष संघटना नव्याने उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर आता नव्या जिल्हाप्रमुखपदासाठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, तसेच आगामी काळात पक्ष संघटनेत आणखी कोणते फेरबदल होतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेच्या नव्या संघटनात्मक रचनेची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून, जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना त्यामुळे आणखी वेग येणार आहे.









