आरंभ मराठी / धाराशिव
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर धाराशिव येथे आज झालेल्या जाहीर सभेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ओमराजे यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. वाघाचे कातडे पांघरलेला लांडगा मी पंधरा वर्षे पोसला पण त्यानेच गद्दारी केली असे म्हणत त्यांनी उपस्थित शिवसैनिकांची माफी मागितली.
मला ओमराजे पाहिजे होता, तर त्यांना खासदार पाहिजे होता. मी शेवटपर्यंत समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही त्यांनी गद्दारी केली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
भाषणाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी यांचे कौतुक केले. २०२२ मध्ये पहिल्यांदा गद्दारी होत असताना आमदार कैलास पाटील यांनी खोक्यांना लाथ मारून गुजरातच्या सीमेवरून परत येत निष्ठा जपली, असे सांगत त्यांनी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.
इथल्या खासदाराकडे हारामाचा पैसा होता म्हणून त्याने गद्दारी केली, पण निष्ठावान शिवसैनिक आजही माझ्यासोबत आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी कष्टकरी शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या निवडणुकीसाठी एक-एक रुपया गोळा करून निष्ठेची लढाई लढण्यासाठी मदत केली होती. मात्र, त्या प्रत्येक मतदाराशी त्यांनी बेईमानी केली, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. स्वतःचा फोन नंबर सर्वांना देणाऱ्या या खासदाराने माझा देखील फोन उचलला नाही.
वाघाचे कातडे पांघरलेला हा लांडगा आजपर्यंत पोसला, याचे आता वाईट वाटते, असे म्हणत त्यांनी ओमराजेंवर निशाणा साधला.
याची एक-एक प्रकरणे आता समोर येत आहेत. ती समोर आल्यानंतर याला उमेदवारी का दिली? याचाच पश्चात्ताप होत आहे, असे सांगत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
धाराशिवची ही गद्दारी आई तुळजाभवानीच्या मातीत झाली असून ही गद्दारी तुम्हीच गाडून टाका, असे आवाहन त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. विकास निधीच्या नावाखाली केवळ नाटक करण्यात आले असून कारखान्यातील भ्रष्टाचार, पवनचक्की घोटाळा आणि इतर अनेक लफडी या खासदाराशी संबंधित असल्याचा गंभीर आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
खासदार ओमराजे यांना जपण्याचा मी शेवटपर्यंत प्रयत्न केला. अखेरच्या दिवसापर्यंत आमदार कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांना पाठवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांनी गद्दारी केली, असे ते म्हणाले. या खासदाराचे जे कारनामे समोर येत आहेत, ते ऐकल्यानंतर हा माणूस म्हणण्याच्या लायकीचाही राहिलेला नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिरालाच लुटणारी भाजप आता बाबर जनता पार्टी झाली आहे. महाराष्ट्र धर्म आणि मराठी अस्मिता संपवण्यासाठी गद्दार झालेले खासदार त्यांना मदत करत आहेत. एवढे करूनही ठाकरे संपणार नाहीत. गद्दारांच्या कितीही पिढ्या आल्या तरी ठाकरे आणि शिवसेना संपणार नाही. शिवसेना ही फक्त आमदार-खासदारांच्या संख्येने मोजली जात नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. सहा खासदारांपैकी पाच जण तयार होते, मात्र ओमराजे हे भाव वाढवण्यासाठी अडून बसले होते.
जास्तीचे खोके मिळाल्यानंतरच इथला खासदार गद्दार झाला, असा आरोप करत त्यांनी गद्दारी करणाऱ्या प्रत्येकाला कायद्याच्या कचाट्यात अडकवणार, असा इशाराही दिला. पीकविमा, शेतमालाला हमीभाव यांसारखे प्रश्न विचारले की केंद्र सरकारकडून “जय श्रीराम” च्या घोषणा देऊन विषयाला बगल दिली जाते. स्वतःची पापे झाकण्यासाठी ही गद्दारी करण्यात आली. आतापर्यंत भावनेच्या राजकारणावर हा खासदार निवडून आला, मात्र आता मिंधे सेनेत गेल्यानंतर त्याला पुन्हा निवडून देऊ नका, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
भाषणाच्या शेवटी गद्दारांना संपवणारच असा शब्द देत ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. या सभेला खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार आदित्य ठाकरे, आमदार अंबादास दानवे, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह मराठवाड्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.









