आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (२८ जून) आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) संदर्भात मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ठाणे शहरात उद्या होणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काही व्यक्तींकडे आढळून आल्याची माहिती समोर आल्यानंतर टीईटी परीक्षेच्याही प्रश्नपत्रिका गैरप्रकाराचा संशय निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर उद्याची टीईटी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली असून, शिक्षण विभागाकडून याबाबतचे अधिकृत आदेश थोड्या वेळात देण्यात येतील. टीईटी परीक्षेसाठी पेपर क्रमांक १ आणि पेपर क्रमांक २ मिळून राज्यभरातून ६ लाख १२५ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
यामध्ये २ लाख २६ हजार २६३ कार्यरत शिक्षकांचाही समावेश आहे. राज्यभरातील विविध जिल्हा केंद्रांवर परीक्षेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली होती. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचविण्यापासून सुरक्षेपर्यंत सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.
अलीकडेच झालेल्या नीट परीक्षेतील प्रश्नपत्रिका गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर टीईटी परीक्षेसाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतल्याचा दावा केला होता. मात्र, तरीही प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील २१ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार होती. या केंद्रांवर १० हजार ७०० परीक्षार्थी परीक्षा देणार होते. त्यामध्ये सुमारे ७०० कार्यरत शिक्षकांचाही समावेश होता. परीक्षा रद्द झाल्यास या सर्व उमेदवारांचा खोळंबा होणार असून, दूरवरून येणाऱ्या परीक्षार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागणार आहे. ही परीक्षा रद्द करून काही दिवसांनी नव्याने घेण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा शिक्षण विभागाकडून अधिकृत घोषणा होणे अद्याप बाकी आहे.
टीईटीसारख्या शिक्षक भरतीसाठी महत्त्वाच्या परीक्षेतही प्रश्नपत्रिका गैरप्रकाराचा संशय निर्माण झाल्याने उमेदवारांमध्ये संतापाचे वातावरण असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.








