आरंभ मराठी | धाराशिव
तुळजापूर तालुक्यातील सराटी गावात सामाईक विहिरीतील पाण्याच्या वापरावरून झालेल्या वादातून चुलत भावाचा कोयत्याने खून केल्याप्रकरणी आरोपी नवनाथ अप्पाराव पाटील याला धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आरोपीस ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
या प्रकरणात रमेश पंडित पाटील यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, सराटी शिवारातील सामाईक विहिरीत फिर्यादीच्या कुटुंबीयांसह आरोपीचाही हिस्सा होता. विहिरीतील पाण्याच्या वापरावरून आरोपी नवनाथ पाटील आणि त्याचे चुलते नरसप्पा बाबुराव पाटील यांच्यात वारंवार वाद होत होते. गावातील बैठकीत नरसप्पा पाटील यांना सामाईक विहिरीवरील मोटारीतून पाणी घेण्याचा निर्णय झाल्यानंतरही हा वाद कायम होता.
१३ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास नरसप्पा पाटील विहिरीवरील मोटारीची वायर जोडण्यासाठी शेतात गेले असता आरोपी तेथे आला. त्यावेळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. संतापलेल्या आरोपीने हातातील कोयत्याने नरसप्पा पाटील यांच्या डोक्यावर आणि हनुवटीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या नरसप्पा पाटील यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाने १७ साक्षीदार तपासले. मृत नरसप्पा पाटील यांचे सख्खे भाऊ पंडित पाटील यांनी न्यायालयात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. जखमी अवस्थेत नरसप्पा पाटील यांनी मला नवनाथने कोयत्याने डोक्यात मारले आहे, असे सांगितल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले.
न्यायालयाने या मृत्यूपूर्वीच्या कथनासह इतर परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरत आरोपीचा गुन्हा सिद्ध झाल्याचे नमूद केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-४ रजेंद्र के. खोमणे यांनी आरोपी नवनाथ अप्पाराव पाटील (रा. सराटी, ता. तुळजापूर) यास भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवत जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन एस. सूर्यवंशी यांनी काम पाहिले. तपास पोलीस निरीक्षक पी. आर. तायवाडे यांनी केला.









