आरंभ मराठी | धाराशिव
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल शनिवारी जाहीर झाल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला असून, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान,त्यांच्या मनधरणीसाठी ठाकरे गटाचे नेते त्यांच्या पुण्यातील घरी पोहोचले होते तर शिवसेना गटाच्या नेत्यांनीही त्यांची भेट घेऊन चर्चा केली. काही वेळापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातून धाराशिवच्या दिशेने निघाले असून, आज दुपारी त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
निकालापूर्वीच ओमराजे यांनी निकालानंतर आपण आपली राजकीय भूमिका स्पष्ट करू, असे सांगितले होते. मात्र न्यायालयाचा निकाल आल्यानंतरही त्यांनी आपला अंतिम निर्णय जाहीर न केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
निकालानंतर माध्यमांशी संवाद साधताना ओमराजे निंबाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशाबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात चर्चेत असलेले शिवसेनेतील कथित ‘ऑपरेशन टायगर’ सध्या तरी अडचणीत आल्याचे मानले जात आहे. विशेषतः काही खासदारांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांमध्ये ओमराजे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असल्याने त्यांच्या निर्णयाची उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान, ओमराजे यांनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर न केल्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षालाही त्यांच्याबाबत आशा कायम असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे आमदार आणि ओमराजे यांचे मित्र कैलास पाटील आणि आमदार वरुण सरदेसाई यांनी शनिवारी रात्री उशिरा ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही नेत्यांनी ही भेट झाल्याचे मान्य केले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप त्यांनी ओमराजे यांच्यापर्यंत पोहोचवल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यात दूरध्वनीवरूनही चर्चा झाल्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.
भेटीदरम्यान ओमराजे यांनी अंतिम निर्णयासाठी दोन दिवसांची मुदत मागितल्याचे समजते. या कालावधीत ते कार्यकर्ते, समर्थक आणि निकटवर्तीयांशी चर्चा करून आपली भूमिका निश्चित करणार असल्याची माहिती मिळत आहे.
ओमराजे निंबाळकर हे आज धाराशिवमध्ये दाखल होणार असून ते प्रथम आपल्या कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधणार आहेत. त्यानंतर पुढील दोन दिवसांत आपली राजकीय दिशा स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे येणारे दोन दिवस धाराशिवसह राज्याच्या राजकारणासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. ओमराजे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच राहण्याचा निर्णय घेतल्यास संभाव्य पक्षांतराच्या हालचालींना मोठा धक्का बसू शकतो. तसेच इतर काही खासदारांच्या भूमिकेवरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ओमराजे यांनी उबाठा गटातच राहण्याचा निर्णय घेतल्यास पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत इतर संभाव्य पक्षांतर करणाऱ्या खासदारांविरोधात कठोर भूमिका घेऊ शकतात. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर निर्माण झालेल्या या नव्या राजकीय समीकरणांमध्ये आता ओमराजे निंबाळकर यांच्या एका निर्णयावर अनेक घडामोडी अवलंबून असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.









