आरंभ मराठी / धाराशिव
नीट पेपरफुटी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून एनटीएकडून परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे देशातील 23 लाख विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजेच National Testing Agency (NTA) ने एक पत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तपास यंत्रणांकडून या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तपासादरम्यान असे समोर आले आहे की, नीट परीक्षेच्या तब्बल १५ दिवसांपासून ते एक महिना आधीच विद्यार्थ्यांमध्ये एक तथाकथित ‘गेस पेपर’ किंवा प्रश्नसंच मोठ्या प्रमाणावर फिरत होता. या प्रश्नसंचामध्ये जवळपास १५० पाने आणि सुमारे ४१० प्रश्नांचा समावेश होता. विशेष म्हणजे, या ४१० प्रश्नांपैकी तब्बल १२० प्रश्न हे रसायनशास्त्र (Chemistry) विषयातील मूळ परीक्षेतील प्रश्नांशी अक्षरशः जुळल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे पेपरफुटीचा संशय अधिकच गडद झाला आहे.
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, नीट यूजी परीक्षेतील ७२० गुणांपैकी सुमारे ६०० गुणांचे प्रश्न काही विद्यार्थ्यांना परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधीच उपलब्ध झाले होते. या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तपास यंत्रणा सध्या या कथित ‘गेस पेपर’च्या माध्यमातून कोणती फसवणूक, गैरप्रकार किंवा गुन्हेगारी स्वरूपाची कृती झाली का, याचा सखोल तपास करत आहेत.
या प्रकरणात विविध राज्यांतील संशयितांची चौकशी सुरू असून अनेक डिजिटल पुरावेही तपासले जात असल्याची माहिती समोर येत आहे. ३ मे रोजी धाराशिव शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती.
अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेनंतर आपल्या गुणांचा अंदाज काढून निकालाची प्रतीक्षा सुरू केली होती. मात्र, परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची शक्यता समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही मोठा मानसिक धक्का बसला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षभर केलेल्या मेहनतीवर पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.










