आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या 17 शाखेच्या विद्यार्थ्यानी रचला नवा इतिहासआरंभ मराठी / धाराशिवधाराशिवमध्ये प्रजासत्ताक दिनी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या वेगवेगळ्या 17 शाखेतल्या 7 हजार विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅलीच्या माध्यमातून नवा इतिहास रचला. प्रचंड उत्साहाच्या वातावरणात शहरातील मुख्य मार्गावरून सुमारे पावणेतीन किलोमिटर अंतराची भव्य दिव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक, आदर्श शिक्षक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यापूर्वीही संस्थेने भव्य तिरंगा रॅली काढली होती. मात्र त्या रॅलीपेक्षा जास्त अंतराची रॅली काढून संस्थेने नवे रेकॉर्ड केले आहे.
76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा धाराशिव शिवसेना जिल्हा संघटक सुधीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पावणेतीन किलोमीटर लांब तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत 7000 विद्यार्थी व आदर्श परिवाराच्या 17 शाखेने सहभाग नोंदविला.
या भव्य तिरंगा रॅलीचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. यावेळी तिरंगा रॅलीवर चार जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.

या रॅलीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणारे जिल्हा शिवसेना संघटक तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय जाधव तसेच संस्थेच्या सरचिटणीस प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, युवा उद्योजक अभिराम पाटील तसेच जिल्हयातील शिवसेना पदाधिकारी व सर्व शाखेचे प्राचार्य विभागप्रमुख, कर्मचारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही तिरंगा रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, बसवेश्वर चौक माणिक चौकमार्गे भोसले हायस्कूलच्या मैदानावर विसर्जित झाली.