आरंभ मराठी / धाराशिव
महिला व बाल विकास विभागाने बालविवाह रोखण्यासाठी अक्षय तृतीयेपासून विशेष मोहीम सुरू केली असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या मोहिमेअंतर्गत बुधवारी (दि.६ मे) एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल ६ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले. विशेष म्हणजे, भूम तालुक्यातील वाकवड येथे एकाच गावात तीन बालविवाह होणार होते.
मात्र प्रशासनाची टीम वेळेत दाखल झाल्याने हे विवाह थांबविण्यात आले. महिला व बाल विकास विभागाने सुरू केलेल्या या मोहिमेमुळे गेल्या तीन आठवड्यांत जिल्ह्यात एकूण ११ बालविवाह रोखण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भूम तालुक्यातील मोजे वाकवड आणि आंबी येथे एकूण चार बालविवाह होणार असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.
त्यानुसार महिला व बाल विकास विभाग, पोलिस प्रशासन आणि बालसंरक्षण पथकाने घटनास्थळी धाव घेतली. वाकवड परिसर डोंगराळ भागात असल्याने पथकाच्या गाड्या थेट गावापर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पायी चालत जाऊन संबंधितांची घरे शोधावी लागली.
परिसरात मोबाईल नेटवर्क नसल्याने संपर्क साधण्यासही मोठ्या अडचणी आल्या. गावातील काही नागरिकांचे सहकार्य न मिळाल्यामुळे मुली व त्यांच्या पालकांचा शोध घेणे कठीण झाले. तथापि, पोलिस प्रशासनाने संबंधित मुली व त्यांच्या पालकांना ताब्यात घेऊन त्यांना बालकल्याण समितीसमोर हजर करण्याचे निर्देश दिले. वाकवड ग्रामपंचायतसमोर हे तीन विवाह नियोजित होते. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे दिवसभरात एकही विवाह होऊ देण्यात आला नाही.
भूम तालुक्यातील आंबी येथे होणारा एक बालविवाहही प्रशासनाने रोखला. याशिवाय उमरगा शहरात एक आणि तुळजापूर तालुक्यातील वडगाव देवसिंगा येथे एक अशा एकूण ६ बालविवाहांवर एकाच दिवशी कारवाई करण्यात आली. या मोहिमेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे, भूम, उमरगा व तुळजापूर तालुक्यांतील महिला व बालकल्याण अधिकारी, संबंधित पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका, बालसंरक्षण अधिकारी विभावरी खुणे, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण, अमर भोसले, शारदा गंडले (समुपदेशिका), तसेच वन स्टॉप सेंटरचे श्रीकांत साठे यांनी सहभाग घेतला. ग्रामीण भागात अजूनही अज्ञान, परंपरा आणि सामाजिक दबावामुळे बालविवाहाचे प्रकार घडत असल्याचे या कारवाईतून समोर आले आहे.








