आरंभ मराठी / धाराशिव
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. शासनाच्या दि. ०४ मे २०२६ रोजीच्या शुद्धीपत्रकानुसार नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) आणि खुल्या प्रवर्गातील आरक्षण संख्येमध्ये बदल करण्यात आल्याने धाराशिव तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा नव्याने काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून निवडणुकीच्या तयारीत असलेल्या इच्छुक उमेदवारांच्या राजकीय समीकरणांना मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी दि. १० जुलै २०२५ रोजी धाराशिव तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. मात्र शासनाने दि. ३० एप्रिल २०२६ रोजी केलेल्या बदलानंतर ओबीसी आणि खुल्या प्रवर्गातील जागांच्या संख्येत फेरबदल करण्यात आला आहे. त्यानुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. फक्त ओबीसीची एक जागा कमी करून खुल्या प्रवर्गात एक जागा वाढविण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील एकूण ६२१ ग्रामपंचायतींसाठी यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणानुसार सरपंच पदासाठी अनुसूचित जातीसाठी १००, अनुसूचित जमातीसाठी १३, ओबीसीसाठी १६८ आणि खुल्या प्रवर्गासाठी ३४० जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. नव्या बदलानंतर ओबीसीच्या जागा १६७ वर आल्या असून खुल्या प्रवर्गाच्या जागा ३४१ झाल्या आहेत.
जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी धाराशिव तालुक्यात सर्वाधिक ११० ग्रामपंचायती असल्याने या बदलाचा सर्वाधिक परिणाम धाराशिव तालुक्यावर झाला आहे. यापूर्वी तालुक्यात अनुसूचित जातीसाठी १९, अनुसूचित जमातीसाठी ४, ओबीसीसाठी ३० आणि खुल्या प्रवर्गासाठी ५७ जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले होते. मात्र नव्या आदेशानुसार ओबीसीची एक जागा कमी होऊन ती संख्या २९ वर आली असून खुल्या प्रवर्गाच्या जागा ५८ झाल्या आहेत.
त्यामुळे धाराशिव तालुक्यातील केवळ नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग या दोन गटांसाठी सरपंच पदाची नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, धाराशिव येथे पार पडणार आहे. या निर्णयाचा परिणाम तालुक्यातील केवळ दोनच गावांवर होणार आहे. परंतु ती दोन गावे कोणती असतील याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातील ४२८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.
नुकतीच अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने गावागावांत निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होऊन जवळपास दहा महिने उलटले असून अनेक इच्छुकांनी निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. मात्र अचानक दोन जागांची पुन्हा नव्याने आरक्षण सोडत जाहीर झाल्याने अनेकांच्या आशा-अपेक्षांवर पाणी फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता १८ मे रोजी होणाऱ्या या सोडतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.








