आरंभ मराठी / धाराशिव
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणारे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बालविवाहावर लक्ष देऊन तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या. त्यानुसार यंत्रणेने अलर्ट मोडवर राहत कारवाई केली.
धाराशिव तालुक्यातील कुमाळवाडी व मुक्काम पोस्ट वानेवाडी येथे दोन बालविवाह होणार असल्याची माहिती चाईल्ड हेल्पलाईन 1098 ला मिळताच प्रशासनाने तात्काळ पावले उचलून हे दोन्ही बालविवाह यशस्वीरित्या रोखले.
मिळालेल्या माहितीनुसार, या बालविवाहाची खात्री होताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 च्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित गावांमध्ये पोहोचून पथकाने ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांसह मुलींच्या घरी भेट दिली.
यावेळी मुलगी व मुलाकडील कुटुंबीयांना समुपदेशन करण्यात आले. तसेच बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत होणाऱ्या गुन्ह्याची व शिक्षेची सविस्तर माहिती देण्यात आली. प्रशासनाच्या समुपदेशनामुळे दोन्ही ठिकाणी नियोजित बालविवाह तात्काळ थांबविण्यात आले.
या कारवाईदरम्यान दोन्ही गावांतील ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, पोलीस पाटील तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा बनसोडे, क्षेत्रीय कार्यकर्ते हर्षवर्धन मोहकर, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक विकास चव्हाण, रविराज राऊत तसेच वन स्टॉप सेंटरचे सोहम पेठे व श्रीकांत साठे यांनीही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
बालविवाह रोखल्यानंतर संबंधित मुला-मुलींच्या कुटुंबीयांना पुढील परिणामांविषयी समुपदेशन करण्यात आले. तसेच संबंधित मुलीला पुढील कार्यवाहीसाठी बालकल्याण समिती, धाराशिव येथे सादर करण्यात आले.








