आरंभ मराठी / धाराशिव :
पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हास्तरीय सोहळ्यात अपेक्षित सन्मान मिळाला नाही. कौतुकाच्या प्रतीक्षेत हे विद्यार्थी तब्बल चार तास ताटकळत बसले. अखेर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वेळ देण्याऐवजी ग्रुपमध्ये बोलावून फोटो काढला. या प्रकारामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविणे ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा स्वतंत्रपणे सत्कार होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पालकमंत्र्यांनी अन्य कार्यक्रमांना वेळ दिला; गुणवंत विद्यार्थ्यांसाठी अवघी दहा मिनिटेही दिली नाहीत.
विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याचीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली नसल्याची तक्रार आहे. ग्रामीण भागातून मोठ्या उत्साहाने आणि कौतुकाच्या अपेक्षेने पहाटे निघालेल्या या विद्यार्थ्यांना मुख्य समारंभात अनेक तास प्रतीक्षा करावी लागली.
भूमसह वेगवेगळ्या तालुक्यातील गावातून गुणवंत विद्यार्थी पालकांसह सत्कारासाठी आले होते. मात्र त्यांना अपेक्षित सन्मान न मिळाल्याने निराश होऊन परतावे लागले.जिल्ह्यातील केवळ ७ ते १० विद्यार्थी सत्कार सोहळ्यासाठी निवडण्यात आले होते.त्यांचीही हेळसांड झाल्याने नियोजनाचा बट्ट्याबोळ असल्याचे दिसून आले.
सत्काराचा घाट कशासाठी?
विद्यार्थ्यांसाठी बसण्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करता येत नसेल, तर अशा सत्कार समारंभाचा घाट कशासाठी, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी त्यांची उपेक्षा झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
राज्याचे उद्याचे भविष्य असलेल्या या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मंत्र्यांकडे दहा मिनिटांचा वेळ नसेल, तर ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा काय घ्यायची, असा सवालही उपस्थित केला जात आहे.










