आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा समोर आला. या बैठकीत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत प्रशासनाच्या एकत्रित कामगिरीला दाद दिली.
बैठकीदरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी कोणताही कागद न पाहता अत्यंत अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणी केली. विविध शासकीय योजनांचा सखोल आढावा घेत त्यांनी अंगणवाडी, शाळा, अभ्यासिका, रुग्णालये तसेच ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची मागणी केली.
प्रत्येक योजनेसाठी आवश्यक निधीचे तपशीलवार विवेचन त्यांनी स्पष्टपणे मांडल्याने पालकमंत्री सरनाईक यांनी त्यांचे कौतुक केले. अर्चनाताई पाटील यांच्या या प्रभावी मांडणीचे कौतुक करत पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, केवळ चार महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचा अभ्यास करून त्यांनी विकासाचे दूरदृष्टीपूर्ण व्हिजन मांडले आहे, ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे.
त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्हा परिषदेला नव्या गतीने विकास साधता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या कामगिरीचाही विशेष उल्लेख केला. धाराशिव जिल्हा कला केंद्रांवरील कारवाईबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, विविध स्तरांवरून दबाव असतानाही प्रशासनाने ठाम भूमिका घेत सहा कला केंद्रांना सील करण्याची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीच्या शेवटी पालकमंत्री सरनाईक यांनी सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी समन्वयाने काम केल्यास धाराशिव जिल्हा आगामी काळात विकासाच्या दिशेने निश्चितपणे प्रगती करेल, असा आशावाद व्यक्त केला.








