आरंभ मराठी / धाराशिव
आज धाराशिव येथील नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांच्या विकास कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र संभाव्य दुष्काळ आणि पाणी-चारा टंचाईसारख्या गंभीर विषयांकडे अपेक्षित लक्ष न दिल्याने बैठकीनंतर नाराजीचा सूर उमटताना दिसला.
बैठकीच्या शेवटी आमदार कैलास पाटील यांनी ‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर निर्माण होऊ शकणाऱ्या दुष्काळजन्य परिस्थितीचा मुद्दा उपस्थित केला. जिल्ह्यात चारा व पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता तातडीने उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली. विशेषतः मान्सून उशिरा येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केल्याने प्रशासनाने सज्ज राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मात्र या महत्त्वाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत पालकमंत्री सरनाईक यांनी पर्यटन विकासासंदर्भातील सादरीकरणाला प्राधान्य दिले. खाजगी कन्सल्टंटकडून पर्यटन प्रकल्पांची ‘पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन’ पाहण्यात अधिक वेळ खर्च करण्यात आला. परिणामी, चारा व पाणी टंचाईसारख्या अत्यावश्यक विषयावर कोणतीही ठोस चर्चा झाली नाही.
सध्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व जलाशयांमध्ये सरासरी ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत असून, मे अखेर हा साठा सुमारे २० टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून अखेरीस तो केवळ ८ ते १० टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत पाऊस लांबल्यास संपूर्ण जिल्ह्यात पाणी व चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशा परिस्थितीत जलव्यवस्थापन, चारा छावण्या आणि पर्यायी पाणीपुरवठा यांसारख्या उपाययोजनांवर तातडीने चर्चा होणे आवश्यक होते. मात्र आजच्या बैठकीत या बाबींचा विचारच न झाल्याने भविष्यातील संकट अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हा नियोजन समितीची पुढील बैठक लवकर होण्याची शक्यता नसल्याने, आजच योग्य नियोजन झाले असते तर संभाव्य टंचाईला प्रभावीपणे सामोरे जाता आले असते, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. आमदार कैलास पाटील यांनी केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष झाल्याने प्रशासनाच्या प्राधान्यक्रमांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.








