आरंभ मराठी / धाराशिव
यावर्षी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि हवामानातील तीव्र बदलामुळे धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून, या शेतकऱ्यांना कोकणच्या धर्तीवर हेक्टरी २२,५०० रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार कैलास बाळासाहेब घाडगे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार घाडगे-पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत केशर आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली असून सध्या सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड आहे. येथील हवामान व भौगोलिक परिस्थितीमुळे धाराशिवमधील केशर आंब्याला विशिष्ट चव व गोडवा प्राप्त झाला असून, काही शेतकरी निर्यातीसाठी देखील हा आंबा पाठवतात.
त्यामुळे या पिकाला आर्थिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, यावर्षी बदलत्या हवामानाचा मोठा फटका आंबा बागांना बसला आहे. मोहर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढ-उतार, फळमाशीचा वाढलेला प्रादुर्भाव तसेच काही ठिकाणी झालेली गारपीट यामुळे आंबा उत्पादनात ८० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. परिणामी आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून अनेक शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत.
या पार्श्वभूमीवर कोकणातील हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत जाहीर करून ती वितरित देखील केली आहे. मात्र धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही, ही बाब अन्यायकारक असल्याचे आमदारांनी निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील केशर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी कृषी विभागाच्या पथकासह धाराशिव जिल्ह्यातील चार तालुक्यांतील आंबा बागांची पाहणी केली होती. या पाहणीत यावर्षी उत्पादनात किमान ५० टक्के घट होणार असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, धाराशिव यांनी नुकसान भरपाईसंदर्भात सविस्तर अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठवला आहे. मात्र या अहवालावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून, कोकणच्या धर्तीवर धाराशिव जिल्ह्यातील केशर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २२,५०० रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी आमदार घाडगे-पाटील यांनी केली आहे.
तसेच ज्या शेतकऱ्यांनी फळबागेचा विमा घेतला आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना सरसकट फळपीक विम्याचा लाभ मिळावा, यासाठीही शासनाने निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील शेतकरी या निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असून, शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्यास संकटात सापडलेल्या आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.









