आरंभ मराठी / धाराशिव
मागील आठ ते दहा दिवसांपासून ‘आपले सरकार सेवा केंद्र’ची साईट बंद असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या RTE प्रवेश प्रक्रिया सुरू असून आज त्याचा शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) गट-ब परीक्षेसाठी अर्ज करण्याचाही आज शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकारी योजनांसाठी तसेच विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांच्या अर्जांसाठी आवश्यक असणारी रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे मिळविण्यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ हा सर्वसामान्यांसाठी प्रमुख व एकमेव पर्याय असतो. मात्र हीच सेवा मागील काही दिवसांपासून ठप्प झाल्यामुळे हजारो अर्जदार अडचणीत सापडले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीचे चार दिवस महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सेवा बंद होती. संप मागे घेतल्यानंतर केवळ एक दिवस साईट सुरू झाली; मात्र त्यानंतर साईट अपडेटच्या कारणास्तव पुन्हा चार दिवसांपासून सेवा बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी, नागरिकांना ना अर्ज करता येत आहेत ना आवश्यक कागदपत्रे मिळत आहेत.
दरम्यान, अनेक विद्यार्थी व पालकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महत्त्वाच्या कालावधीतच साईट बंद ठेवणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहे.










