आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या सहकार्याने पाच नवीन देवराया विकसित करण्यात येणार आहेत. प्रत्येकी पाच एकर क्षेत्रावर या देवराया साकारल्या जाणार असून, त्यासाठी नामांकित कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून आर्थिक सहभाग घेण्यात येणार आहे. या उपक्रमासंदर्भात आज मुंबई येथे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीला ‘सह्याद्री देवराई’ संस्थेचे अध्यक्ष तथा अभिनेते सयाजी शिंदे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) उपव्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर तसेच टाटा मोटर्स, रिलायन्स फाउंडेशन, अशोक लेलँड, इंडियन ऑईल आणि टोयोटा या कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत प्रत्येक देवराईमध्ये सुमारे २ हजार ५०० देशी वृक्षांची लागवड केली जाणार आहे. केवळ वृक्षलागवड न करता त्यांचे पुढील पाच वर्षे संगोपन व संवर्धन केले जाणार असल्याने या उपक्रमातून दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. एका देवराईच्या संवर्धनासाठी दरवर्षी सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच वर्षांच्या कालावधीसाठी एका देवराईवर अंदाजे अडीच कोटी रुपये खर्च होणार असून, पाच देवरायांसाठी हा खर्च सुमारे १२.५० कोटी रुपये इतका होण्याची शक्यता आहे. हा निधी CSR च्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात या देवरायांसाठी आवश्यक असलेली जमीन निश्चित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि वन विभागाला देण्यात आले आहेत. योग्य जागांची निवड झाल्यानंतर वृक्षलागवड आणि संवर्धनाच्या कामाला गती मिळणार आहे.
‘देवराई’ ही महाराष्ट्राच्या पारंपरिक पर्यावरण संवर्धन व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग मानली जाते. स्थानिक जैवविविधतेचे संरक्षण, भूजल संवर्धन, मातीची धूप रोखणे तसेच स्थानिक वातावरणाचा समतोल राखण्यास अशा वनक्षेत्रांचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे धाराशिवमध्ये प्रस्तावित पाच देवराया जिल्ह्याच्या पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. CSR निधी, प्रशासन आणि ‘सह्याद्री देवराई’ संस्थेच्या संयुक्त सहभागातून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी वृक्षसंपदा निर्माण होण्यास मदत होणार आहे. विशेषतः वृक्षलागवडीसोबतच पाच वर्षांच्या संगोपनाची तरतूद असल्याने लागवड केलेल्या वृक्षांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यावर भर दिला जाणार आहे.










