आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि सार्वजनिक जागांवर करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात नगरपरिषद प्रशासनाने मंगळवारी (दि.८) धडक कारवाई केली. फळविक्रेते, हातगाडीचालक आणि पानटपरीधारकांनी केलेली अतिक्रमणे हटवून मुख्य रस्ते व पदपथ मोकळे करण्यात आले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, तुळजाभवानी व्यापारी संकुल, एस.टी. स्टॅण्ड परिसर ते सेंट्रल बिल्डिंग या मार्गावर वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत होती. रस्त्यांची रुंदी कमी झाल्याने नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णवाहिकांना वाहतुकीत अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. याबाबत नागरिकांकडून प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमणधारकांना ७ सप्टेंबरपर्यंत स्वतःहून अतिक्रमणे हटविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सुमारे ८० टक्के अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही शिल्लक राहिलेल्या अतिक्रमणांवर नगरपरिषद प्रशासनाने आज प्रत्यक्ष कारवाई करत ती हटविली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नगरपरिषदेच्या गाळाधारकांनी गाळ्यांसाठी निश्चित केलेली जागा सोडून इतर सार्वजनिक जागेवर केलेले अतिक्रमण आज सायंकाळपर्यंत काढून घेण्याची अंतिम मुदत प्रशासनाने दिली आहे. संबंधित गाळाधारकांनी मुदतीत अतिक्रमण न हटविल्यास बुधवारी (दि.९) त्यांच्यावर नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करणे, नागरिकांना सुरक्षित व मोकळा मार्ग उपलब्ध करून देणे आणि वाढत्या अपघातांना आळा घालणे या उद्देशाने ही कारवाई करण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले. सार्वजनिक रस्ते व पदपथांवर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही नगरपरिषद प्रशासनाने दिला आहे.









