आरंभ मराठी / धाराशिव
खरीप २०२५ पिक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित असलेला पिक विम्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून शेतकऱ्यांना विमा रक्कम देण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. राज्यस्तरीय समितीसमोर प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर अखेर सुनावणी होऊन शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पिक विमा प्रकरणात आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीकडून जिल्ह्यातील ३६७ पिक कापणी प्रयोगांवर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र जिल्हास्तरीय समितीने हे सर्व आक्षेप फेटाळून लावले होते.
त्यानंतर विमा कंपनीने राज्यस्तरीय समितीकडे अपील केले होते. मात्र या अपीलवर सुमारे तीन महिन्यांपासून सुनावणी प्रलंबित राहिली. अखेर झालेल्या सुनावणीत राज्यस्तरीय समितीनेही विमा कंपनीचा दावा फेटाळत शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महसूल मंडळनिहाय वेगवेगळी पिक विमा रक्कम मिळणार आहे.
मात्र हेक्टरी किती रक्कम मिळणार याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही. पुढील काही दिवसांत याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील सुमारे चार लाख शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर मिळालेल्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.









