आरंभ मराठी / धाराशिव
बेंबळी येथील स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (दि.९) दुपारी झालेल्या भीषण अपघातात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तथा बीएलओ गोविंद भैरु इंगळे (वय ५०, रा. कनगरा, सध्या साळुंके नगर, धाराशिव) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकाची चूक असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
कारचालकाने निष्काळजीपणे राँग साईडने भरधाव कार चालवल्यामुळे हा अपघात झाला आहे. संबंधित कारचालकाविरुद्ध बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डॉ. पांडुरंग भैरुनाथ इंगळे यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, मयत गोविंद इंगळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेंबळी येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच ते बीएलओचे कामही करत होते. शुक्रवारी सकाळी ते बेंबळी येथील गणेशनगर परिसरात बीएलओच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी गेले होते.
दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या TVS iQube इलेक्ट्रिक स्कुटी (MH 25 BC 2284) वरून गणेशनगरहून जात असताना बेंबळी-धाराशिव मार्गावर स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. फिर्यादीनुसार, धाराशिवकडून बेंबळीकडे येणारी किया कंपनीची काळ्या रंगाच्या सोनेट कारने (MH 25 AS 7776) भरधाव वेगात व चुकीच्या बाजूने येऊन गोविंद इंगळे यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर स्कुटी रस्त्याच्या कडेला १० ते १५ फूट अंतरावर फेकली गेली, तर कार रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन स्वराज्य पानटपरी व शिवम टायर वर्क्स या दुकानांमध्ये घुसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी गंभीर जखमी अवस्थेत गोविंद इंगळे यांना ग्रामीण रुग्णालय बेंबळी येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या शरीराला गंभीर दुखापती झाल्या होत्या. उजवा पाय घोट्यापासून मांडीपर्यंत चेंदामेंदा झाला होता, डाव्या पायाला गंभीर जखम होती तसेच डोक्याला व पाठीमागील भागाला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेचे प्रत्यक्षदर्शी म्हणून अभिजीत बाबासाहेब इंगळे व सुरज दादाराव इंगळे यांनी कारचालक दिनेश धोंडिराम हेड्डा (रा. बेंबळी) हा भरधाव वेगात व राँग साईडने वाहन चालवत असल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या अपघाताचा मोठा धक्का इंगळे परिवाराला बसला असून आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी इंगळे परिवाराने केली आहे.









