आरंभ मराठी / तुळजापूर
शहरातील दीपक चौक परिसरात घडलेल्या निर्घृण हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या रक्तरंजित घटनेत 19 वर्षीय युवकाचा जीव गेला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत युवकाचे नाव कृष्णा आनंत रसाळ (वय 19, रा. एस.टी. कॉलनी, तुळजापूर) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 2 मेच्या रात्री ते 3 मेच्या पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास दीपक चौक येथे कृष्णा व एका अज्ञात व्यक्तीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. सुरुवातीला सामान्य भांडण वाटणारा हा वाद अचानक विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाले.
वादाच्या भरात अज्ञात हल्लेखोराने संतापाच्या भरात धारदार शस्त्र काढून कृष्णा रसाळ यांच्या गळ्यावर सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले कृष्णा मदतीसाठी झुंज देत होते. परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.
जखमी अवस्थेत कृष्णा यांना तातडीने तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी वेळ न दवडता त्यांना सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये हलवले. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र मोठ्या प्रमाणावर झालेल्या रक्तस्त्रावामुळे दिनांक 3 मे रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान कृष्णा रसाळ यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस हवालदार बालाजी कामतकर व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वादाचे मूळ कारण काय होते, हल्लेखोर कोण आहे, तसेच कोणत्या प्रकारचे शस्त्र वापरण्यात आले, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी फरार असल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.










