रखडलेल्या कामामुळे आणखी एका तरुणाचा बळी; दररोज जखमी होणाऱ्यांची संख्या मोजणार कोण, आणखी किती काळ सहन करायचे ?
_
आतातरी निर्दयी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहरातील रस्त्याच्या समस्येतून मार्ग काढायला ना पालिका प्रशासन तयार आहे ना सार्वजनिक बांधकाम विभाग.दोन्ही विभागाकडून नागरिकांचे प्रचंड हाल केले जात आहेत.कोणत्या जन्माची चूक धाराशिवकर भोगत आहेत याचे उत्तर सत्ताधारी पक्षानेच द्यायला हवे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही विकासाची कामे अडकतात कुठे, ठेकेदारावर इतकी मेहेरबानी का केली जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.दरम्यान, ठेकेदार अजमेरा याच्या निर्दयीपणामुळे मंगळवारी रात्री खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी याच खड्ड्यात सोलापूर जिल्ह्यातील एक कार पडून अपघात झाला होता. दुर्दैवाने नेहमीप्रमाणे सोशिक जनता हे सहन करत असून,त्यामुळे ठेकदाराला आणि प्रशासनाला किंचितही फरक पडत नाही.
धाराशिव शहरातून गावाकडे जाणाऱ्या भंडारवाडी येथील एका २५ वर्षीय तरुणाचा खड्ड्यात पडून मंगळवारी रात्री मृत्यू झाला. बार्शी ते बोरफळ रस्त्याचे काम जागोजागी रखडलेले आहे. धाराशिव शहरात ३० ऑक्टोबर २०२५ रोजी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती.या सहा महिन्यात केवळ पाऊण किलोमीटर तेही एकेरी बाजूंचे काम झाले असून, दुसऱ्या बाजूचा रस्ता सुमारे ३ फुटांनी खाली गेला आहे.
दुसऱ्या बाजूचे काम ठप्प आहे, अजमेरा नामक ठेकेदाराकडे हे काम असून, शहरातील उर्वरित भागातील कामेही अजमेरा नामक ठेकेदाकडे आहेत. या मार्गावर शाळा,महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आहेत. हजारो विद्यार्थी जीव मुठीत घेऊन अध्ययन करत आहेत.दररोज अपघात घडत आहेत.मात्र नगर पालिका, रस्ते विकास महामंडळ आणि नगर पालिकेच्या अकार्यक्षम,हेकेखोर प्रवृत्तीमुळे जनतेला वेठीस धरले जात असून, निर्ढावलेला,निर्दयी ठेकेदार कामे अर्धवट सोडून अन्य जिल्ह्यातील कामांना प्राधान्य देत आहे.
त्यामुळे धाराशिवमध्ये खड्डेमय रस्त्याने दोन वर्षात दुसरा बळी घेतला आहे.वास्तविक दररोजचे वाढलेले अपघात आणि जखमी होणाऱ्यांची संख्या मोजायला ना प्रशासनाला वेळ आहे ना धाराशिवकराना.
आतापर्यंत रस्त्यांच्या कामांमध्ये विरोधक आणि सत्ताधारी असा संघर्ष होता,असे सांगितले जात होते. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना नेमका अडथळा आहे कुणाचा, कामे का होत नाहीत, आणखी किती बळी घ्यायचे आहेत, निर्दयी ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही,असे अनेक प्रश्न सामान्य नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाले आहेत.
धाराशिव शहरातील रस्त्याचे दुखणे संपवण्यासाठी सक्षम ठेकेदाराला कामे देऊन नागरिकांची या जीवघेण्या त्रासातून सुटका करावी अशी मागणी केली जात आहे.








