आरंभ मराठी / धाराशिव
गेल्या तीन दिवसापासून राज्यात सुरू असलेला कृषी सेवा केंद्र चालकाचा संप मागे घेण्यात आला आहे. कृषी सेवा केंद्र चालकांच्या विविध प्रश्नावर सुरू असलेला संप मागे घेण्याबाबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सोबत माफदा संघटनेची बैठक पार पडली.
मंत्रालय परिषद सभागृह येथे या बैठकीला कृषि विभागाचे सचिव परिमल सिंह ऑनलाईन, कृषि आयुक्त सुरज मांढरे, कृषि संचालक सुनिल बोरकर, माफदा संघटनेचे विनोद तराळ पाटील, ऑल इंडियाचे अध्यक्ष मनमोहन कलंतरे यासह संघटनेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत राज्यात उत्तरप्रदेशच्या धर्तीवर खते लीकिंग बंद करणेबाबत लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याची माहिती कृषी मंत्री यांनी दिली. ज्या कंपन्यांना अनुदानित खते विक्रीचा अधिकार आहे, त्या कंपन्यांना विनाअनुदानित खते व इतर कृषी निविष्ठांची विक्री करता येणार नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात २७ एप्रिलपासून सुरू असलेल्या कृषि सेवा केंद्र चालकाचा संपाबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता हा संप मागे घेण्याची विनंती यावेळी त्यांनी संघटनेला केली.
शेजारील राज्यातून येणाऱ्या अप्रमाणित एचटीबीटी कपाशी बियाण्यांवर केंद्र व गृह विभागाशी समन्वय साधून कडक कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत पारदर्शकता यावी यासाठी ‘साथी’ पोर्टलचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन देखील विक्रेत्यांना करण्यात आले. विक्रेत्यांच्या अडचणी सोडवणे ही शासनाची जबाबदारी आहे.
आवश्यकतेनुसार प्रशिक्षणाचा कालावधी वाढविण्यात येणार असून ई-पॉस वापरकर्त्यांवर तात्पुरती कारवाई केली जाणार नाही, तसेच सीलबंद पॅकेजिंगबाबत विक्रेत्यांना दिलासा देण्याबाबतही सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. मुदतबाह्य किटकनाशकांबाबत कंपन्यांसोबत चर्चा करून योग्य तो मार्ग काढणार असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी यावेळी दिली. सोमवारपासून सुरू झालेला हा संप अखेर आज (दि.३०) मागे घेण्यात आला. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच हा संप पुकारल्यामुळे आहे शेतकऱ्यांची अडचण वाढली होती. आजपासून कृषी केंद्र चालकांनी पुन्हा आपली दुकाने सुरू केली आहेत.









