आरंभ मराठी / धाराशिव
अंधश्रद्धा, धमक्या आणि जात पंचायत यांच्या संगनमतातून एका महिलेकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागरबाई जगु पवार, ज्योती ज्योतीराम पवार, ज्योतीराम जगु पवार आणि प्रियंका गणेश पवार (रा. जुना बसडेपो, दुध डेअरी पाठीमागे, धाराशिव; सध्या मुक्काम पंचनगर, घाटकोपर, मुंबई) यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडवून आणली.
फिर्यादी गायत्री शाम चव्हाण (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, “तुझा मुलगा आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवला, त्यामुळे देव कोपला आणि आमच्या मुलाचा अपघात झाला,” असा आरोप करत आरोपींनी फिर्यादी व तिच्या मुलाला जबरदस्तीने तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिडी येथे नेले. तेथे जात पंचायत बसवून दोघांनाही शिवीगाळ करण्यात आली तसेच चप्पलने मारहाण करण्यात आली.
यानंतर फिर्यादी व तिच्या मुलाला दोषी ठरवत तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. त्यातील किमान ६० हजार रुपये तात्काळ द्यावे, अन्यथा “उचलून नेऊन जीव घेऊ,” अशी धमकी देण्यात आली. या भीतीपोटी फिर्यादीकडून ६० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी गायत्री चव्हाण यांनी २० एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 308(2), 115(2), 352, 351(2), 3(5) तसेच जात पंचायत प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3, 4, 5, 6 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.








