आरंभ मराठी / धाराशिव
अल्पवयीन मुलीचे गुपचूप लवकर लग्न उरकण्याच्या तयारीत असलेल्या ठिकाणी प्रशासनाचे पथक वेळेत पोहोचल्यामुळे हा अल्पवयीन विवाह सोहळा होऊ शकला नाही. ही घटना बुधवारी (दि.२२) भूम तालुक्यात घडली. भूम तालुक्यातील मौजे आष्टा येथे १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेचा विवाह होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच जिल्हा बाल संरक्षण कक्ष धाराशिव आणि चाईल्ड हेल्पलाइन १०९८ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मोठी कारवाई करत बालविवाह रोखण्यात यश मिळवले.
मात्र, पथक पोहोचण्यापूर्वीच संबंधित बालिकेचे आई-वडील तिला घेऊन पसार झाले होते. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले. यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने पाठपुरावा सुरू ठेवत परिसरात चौकशी केली असता बालिकेला सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी येथे नेण्यात येत असल्याची माहिती समोर आली. ही माहिती मिळताच बालकल्याण समिती सोलापूर यांच्याशी समन्वय साधण्यात आला.
तसेच संबंधित पालकांशी सतत फोनवर संपर्क साधून त्यांना समजावण्यात आले. अखेर प्रशासनाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश येत पालकांनी बालिकेसह परत येण्यास मान्यता दिली. यानंतर बालिकेला ताब्यात घेऊन बालकल्याण समिती धाराशिव यांच्या आदेशानुसार बालाजी नगर, धाराशिव येथील ‘शक्ती सदन’ मध्ये तात्पुरता प्रवेश देण्यात आला आहे. सध्या बालिकेची सुरक्षिततेची सर्व काळजी घेतली जात आहे.
या कारवाईवेळी गावातील ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील प्रज्ञा बनसोडे, चाईल्ड हेल्पलाइन १०९८ चे अभय काळे व पल्लवी पाटील, बिट अंमलदार तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून अशा घटना रोखण्यासाठी प्रशासन सतर्क आहे. नागरिकांनीही अशा प्रकारांची माहिती त्वरित चाईल्ड हेल्पलाइन १०९८ वर देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.








