आरंभ मराठी / धाराशिव
भेसळयुक्त व बोगस रासायनिक खताची विक्री केल्याप्रकरणी अखेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणाचा कसून तपास सुरू झाला आहे.
या बोगस खत प्रकरणात अनिल धर्माप्पा नागराळ, सुचेता खंडेराव स्वामी आणि ओंकार खंडेराव स्वामी यांच्याविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच अत्यावश्यक वस्तू कायदा आणि रासायनिक खते नियंत्रण आदेशांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हा प्रकार १८ जून २०२६ रोजी उघडकीस आला होता. अणदूर व परिसरातील काही शेतकऱ्यांनी बोगस खत विक्री होत असल्याचा आरोप करत तब्बल ४०० ते ५०० पोती खत जिल्हाधिकारी कार्यालयात आणले होते. संबंधित खताची तपासणी करून बोगस खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती.
त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत कृषी विभागाला आवश्यक कारवाईचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी गुन्हा दाखल झाला आहे.
नळदुर्ग पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्यानुसार, महाराष्ट्र फर्टिलायझर ॲण्ड केमिकल प्रा. लि. या खत उत्पादक कंपनीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेला असतानाही संबंधित कंपनीच्या नावाने मिश्र खताचे भेसळयुक्त उत्पादन व विक्री केल्याचा आरोप आहे.
१८ जून रोजी रात्री अणदूर येथील ओंकार कृषी सेवा केंद्रात, तर १९ जून रोजी नळदुर्ग येथील ओंकार कृषी सेवा केंद्रात संबंधित खताची विक्री केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान १०:२०:२० या मिश्र खताच्या १०० बॅगपैकी ८० बॅग, २०:२०:०० या खताच्या १०० बॅगपैकी ९२ बॅग आणि १८:१८:१० या खताच्या १०० बॅगपैकी ७१ बॅग भेसळयुक्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या खताची एकूण किंमत ३ लाख १ हजार २५० रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीनुसार समोर आले आहे. भेसळयुक्त खताची विक्री करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच उर्वरित खताच्या बॅग विक्री करण्याच्या उद्देशाने गोदामात साठवून ठेवण्यात आल्याचेही पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी धाराशिव येथील कृषी अधिकारी दिनेश प्रल्हादराव बनसोडे (वय ५४) यांनी ११ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३(५) तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यातील कलम ७, ३(२)(ए), ७(२)(डी), ३(२)(डी) आणि रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे.










