गुटखा वाहतूक प्रकरणात आरोपींसह पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर मकोका अंतर्गत कारवाईची मागणी
आरंभ मराठी /धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून,हाणामाऱ्या, चोऱ्या,गुंडगिरीने सामान्य नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.मात्र,पोलिस प्रशासनाचा वचक नसल्याने गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. यात भर म्हणजे या नळदुर्ग परिसरात गुटखा वाहतूक प्रकरणातील एका आरोपीने थेट पोलिसांना धमकावले,मात्र पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही.
त्यामुळे मुख्य आरोपीला पोलिसांनी पाठबळ दिल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला असून, त्यांनी आरोपीबाबत माहिती देऊनही कारवाई न केल्याबद्दल येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात एसपी रितू खोखर यांच्यावर हक्कभंग आणणार असल्याचा इशारा दिला आहे.दरम्यान,आता जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या संदर्भात आमदार धस यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली असून,त्यात जिल्ह्यातील पोलिस विभागातील गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची दखल घेण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यात गुटखा व अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी थेट राज्याच्या पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नळदुर्ग परिसरातील गुटखा वाहतूक प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिसांचे पाठबळ मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सदर प्रकरणात संबंधित आरोपीबाबत माहिती देऊनही पोलिसांकडून कारवाई न झाल्याने आमदार धस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावर येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात जिल्हा पोलिस अधीक्षकांवर हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
महासंचालकांकडे दिलेल्या निवेदनात धस यांनी राज्यातील अमली पदार्थांच्या तस्करीबाबत चिंताजनक बाबी मांडल्या आहेत. २०२५ च्या पहिल्या चार महिन्यांत सुमारे २८,३०९ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची किंमत सुमारे १,७५३ कोटी रुपये असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. गुटखा बंदी असतानाही रस्त्यावर तसेच शाळा परिसरात तो सहज उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांसह तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, नळदुर्ग गुटखा तस्करीतील आरोपींवर MCOCA अंतर्गत कारवाई करावी, वाहतूक व विक्री करणाऱ्यांसह त्यांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई, मुख्य आरोपींवर नॉन-बेलेबल वॉरंट जारी करावे, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी व बदली करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पोलिस प्रशासनाचा धाक नसल्याने वाढणारी गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असतानाच आता आमदार सुरेश धस यांनी थेट राज्याच्या पोलिस प्रमुखांकडे तक्रार केल्याने खळबळ उडाली आहे.










