आरंभ मराठी / धाराशिव
शहरातील शाळा व महाविद्यालयीन परिसर असलेल्या जिजाऊ चौक भागात मुली-महिलांची छेडछाड, टवाळखोरी आणि हाणामारीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रयत्नाने पोलिस चौकी मंजूर करण्यात आली होती. या चौकीमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था राखली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र प्रत्यक्षात ही पोलिस चौकी सध्या ‘शोभेची बाहुली’ ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. जिजाऊ चौक हा शहरातील अत्यंत गजबजलेला शैक्षणिक परिसर असून येथे अनेक खासगी शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस आहेत.
त्यामुळे दिवसभर विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. गेल्या काही वर्षांत या परिसरात टवाळखोरीचे प्रमाण वाढले असून दुचाकीवरून येणाऱ्या काही तरुणांकडून मुलींची छेडछाड केली जाते. यामुळे मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. याच मार्गावर बसस्थानकापर्यंतही अशा प्रकारांच्या घटना वाढल्याचे समोर येत आहे.
या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस चौकीची मागणी जोर धरत होती. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करत पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पोलिस विभागाकडून तीन वर्षांतील गुन्हे, वाढती वाहतूक व अन्य ठाण्यांवरील ताण यांचा अहवाल सादर करण्यात आला आणि अखेर सुमारे दहा महिन्यांपूर्वी जिजाऊ चौक येथे पोलिस चौकी कार्यान्वित करण्यात आली.
या चौकीसाठी सुमारे दहा लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र, या चौकीत चोवीस तास पोलिस कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात दिवसभर एकही कर्मचारी येथे दिसून येत नाही. आदेशानुसार आनंदनगर आणि शहर पोलिस ठाण्यांमधून प्रत्येकी दोन असे चार कर्मचारी दररोज नियुक्त असतात.
तरीही चौकी ओस पडलेलीच असते. आनंदनगर आणि शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारीदेखील चौकीकडे फिरकत नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. सध्या या भागात राज्य मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून वारंवार वादावादी आणि भांडणांचे प्रसंग उद्भवत आहेत.
मागील महिन्यात तर याच पोलिस चौकीच्या आवारात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली होती. अशा परिस्थितीत पोलिसांची सतत उपस्थिती अत्यंत गरजेची असताना चौकी रिकामी असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दररोज नियुक्त असलेले चार कर्मचारी नेमके कुठे जातात, हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
पोलिस चौकी केवळ नावापुरती उभारून उपयोग काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन चौकीत नियमित कर्मचारी नियुक्त करून परिसरात सुरक्षित वातावरण निर्माण करावे, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.









