आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पवनचक्की परिसरात दरोडे व चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशा घटनांसाठी
जबाबदार असलेली टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली असून, या कारवाईत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून तब्बल ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक ७ एप्रिल २०२६ रोजी बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उमरेगव्हाण शिवारात पवनचक्कीवर कार्यरत दोन सुरक्षारक्षकांना दोरीने बांधून त्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा व रोख रक्कम लुटून आरोपी पसार झाले होते.
याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकारच्या चोरीच्या घटना जिल्ह्यात इतर ठिकाणीही घडल्या होत्या. या गंभीर व अतिसंवेदनशील गुन्ह्यांची दखल घेत पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले होते.
त्यानुसार दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ढोकी–कळंब रोडवरील गोविंदपूर पाटी येथे सापळा रचून ५ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून २ महिंद्रा स्कॉर्पिओ, १ बोलेरो, तांब्याच्या तारा व रोख रक्कम असा एकूण ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपींनी मेंढा, उमरेगव्हाण, चिकुंद्रा, गंधोरा, कन्हेरवाडी व वाशी परिसरात पवनचक्कीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली. तसेच चोरी करताना सुरक्षारक्षकांना धमकावण्यासाठी मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुनिल कालिदार शिंदे (रा. ढोकी), लखन बापू पवार (रा. उपळा), सिद्राम पोपट पवार (रा. वरूडा), उद्धव बापू शिंदे (रा. बावी) आणि विक्रम लक्ष्मण पवार (रा. खामकरवाडी) अशी आहेत.
त्यांच्या इतर साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार तसेच बेंबळी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.








