आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात तब्बल २३ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्यामुळे कृषी विभाग राज्यभर चर्चेत असतानाच आज या प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण मिळाले. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साळवे हे आज सकाळी कार्यालयात येत असताना मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बाहेर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याची घटना घडली. या प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून कृषी विभागातील कर्मचारी संघटना आक्रमक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र साळवे हे बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालयाकडे येत होते. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या जवळ येत अचानक त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेनंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी एकत्र आले. धाराशिव जिल्ह्यातील कृषी निविष्ठा घोटाळ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कृषी विभागावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणात तब्बल २३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप असून, मागील आठवड्यात जिल्ह्यातील १४ कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याने या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर अद्याप निलंबनाची कारवाई झालेली नसून त्यांच्याविरोधात केवळ विभागीय चौकशी सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सुरू आहे. कृषी निविष्ठा घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारण्यास अधिकारी तयार नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजेंद्र साळवे यांनी प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. मात्र पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसांतच त्यांच्यावर शाईफेक झाली आहे. याशिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावरून नुकतेच निवृत्त झालेले राजकुमार मोरे यांचे नावही कृषी निविष्ठा घोटाळ्याच्या चर्चेत आले आहे. मात्र ते निवृत्त झाल्यामुळे त्यांच्यावर कोणती कारवाई करण्यात आली नाही. प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र साळवे यांच्यावर झालेल्या शाईफेकीच्या घटनेचा कृषी कर्मचारी संघटनेने तीव्र निषेध केला आहे. घटनेनंतर कृषी विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने एकत्र आले. संबंधित अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत आहे.
या मागणीसाठी कृषी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या भेटीसाठी गेले आहेत.











