आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील २०२५-२६ मधील राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत झालेल्या तब्बल २१ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी अखेर मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी चौकशी अहवालाच्या आधारे १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. चौकशीत मृत, भूमिहीन, दुबार आणि बिगर सभासद लाभार्थ्यांच्या नावावर कृषी साहित्य वाटप, अर्ज न केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर लाभ दाखविणे तसेच बनावट बिले काढून कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, चौकशीत १९ जणांची नावे समोर आली असताना केवळ १५ जणांवरच कारवाई झाल्याने उर्वरित अधिकाऱ्यांवरही कारवाईची मागणी होत आहे.
————————–
धाराशिव जिल्ह्यातील २०२५-२६ मधील कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी १५ कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्यानंतर कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या कारवाईत २ जिल्हा कृषी अधीक्षक, ८ तालुका कृषी अधिकारी आणि ४ मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. लातूर जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी सादर केलेल्या ७६ पानी चौकशी अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चौकशीत मयत, भूमिहीन, दुबार आणि बिगर सभासद लाभार्थ्यांच्या नावावर कृषी निविष्ठांचे वाटप झाल्याचे समोर आले आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बुधवारी या प्रकरणातील १५ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याने कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाणे, बीजप्रक्रिया औषधे आणि इतर कृषी निविष्ठांचे वाटप करण्याची शासनाची योजना आहे. मात्र, २०२५-२६ मध्ये धाराशिव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी १२ एप्रिल २०२६ रोजी कृषी विभागाकडे तक्रार दाखल झाली होती. सुरुवातीला १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, हळूहळू त्याची व्याप्ती वाढत जाऊन हा घोटाळा २१ कोटी रुपयांचा असल्याचे समोर आले होते.
यानंतर आमदार कैलास पाटील यांनी १ मे रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर ‘दैनिक ‘आरंभ मराठी’ने या घोटाळ्याची सर्वप्रथम बातमी प्रसिद्ध केली होती.
चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर –
या घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अर्जच न केलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर लाभ दाखविणे, मृत शेतकऱ्यांच्या नावाने कृषी साहित्य वितरित झाल्याची बनावट कागदपत्रे तयार करणे, प्रत्यक्ष लाभ न देता बनावट बिले उचलणे, तसेच शेतीच नसलेल्या व्यक्तींना लाभार्थी दाखविणे असे गंभीर प्रकार उघड झाले.
माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांनुसार जिल्ह्यातील तब्बल २२ हजार ४०० शेतकऱ्यांना केवळ कागदोपत्री कृषी साहित्य वितरित दाखवून सुमारे २१ कोटी रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.
सुरुवातीला १९ जणांवर संशय –
या प्रकरणातील चौकशीत तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आठ तालुका कृषी अधिकारी, एका मंडळ कृषी अधिकाऱ्यासह १९ जणांचा सहभाग आढळल्याचे समोर आले होते. त्यानंतर संबंधितांवर कारवाईचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. दरम्यान, यामध्ये संशयित असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे हे ३१ जुलै रोजी नियत वयोमानामुळे निवृत्त झाल्यामुळे या प्रकरणात १८ जणांची नावे समोर आली होती. या प्रकरणात १९ जणांची नावे असताना केवळ १५ जणांवरच कारवाई केल्यामुळे उर्वरित चार अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
एक आठवड्यापूर्वी निवृत्त –
याप्रकरणी कारवाईला विलंब होत असल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे यांच्या निवृत्तीपूर्वीच यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. मात्र, या मागणीची दखल न घेतल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी कृषी आयुक्तालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन करत दोषींवर तातडीने कारवाईची मागणी केली होती.
दरम्यान, तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे हे ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीपूर्वीच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी सातत्याने लावून धरली होती. अखेर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकरणात १५ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे.
–
चौकशीत जबाबदार धरलेले वरिष्ठ अधिकारी –
१) पुरुषोत्तम वाघमारे – प्रभारी कृषी उपसंचालक
२) राजकुमार मोरे – जिल्हा कृषी अधीक्षक
३) महादेव असलकर – तत्कालीन प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी
४) राहुल दिवाणे – तंत्र अधिकारी
५) राहुल सूर्यवंशी – सहायक कृषी अधिकारी
–
कारवाई झालेले तालुका कृषी अधिकारी –
१) राजाराम बर्वे – तालुका कृषी अधिकारी, वाशी
२) अतुल ढवळे – तालुका कृषी अधिकारी, भूम
३) नानासाहेब लांडगे – तालुका कृषी अधिकारी, परंडा
४) भागवत सरडे – तालुका कृषी अधिकारी, कळंब
५) महेश देवकते – तालुका कृषी अधिकारी, लोहारा
६) ज्ञानोबा रितापुरे – तालुका कृषी अधिकारी, उमरगा
७) आबासाहेब देशमुख – तालुका कृषी अधिकारी, तुळजापूर
–
कारवाई झालेले मंडळ कृषी अधिकारी –
१) श्रीमती पल्लवी मच्छिंद्र काटकर – मंडळ कृषी अधिकारी, अणदूर
२) विठ्ठल गोविंद नागटिळक – मंडळ कृषी अधिकारी, काटी
३) सत्यजीत गजेंद्र देशमुख – मंडळ कृषी अधिकारी, नळदुर्ग
४) अमित अशोक भोसले – मंडळ कृषी अधिकारी, तुळजापूर









