आरंभ मराठी / धाराशिव
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे २९ ऑगस्टपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस आहे. राज्य सरकारकडून अद्याप आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने अखेर जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे कूच करणार आहेत.
येत्या १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आंतरवली सराटी येथून लाखो मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वी १२ सप्टेंबरपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाच्या मागणीची दखल घेतली नाही, तर मुंबईकडे कूच करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शनिवारी राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने मराठा बांधव आंतरवली सराटी येथे दाखल झाले. यावेळी उपस्थित आंदोलकांना संबोधित करताना जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. जरांगे पाटील यांनी सांगितले की, १४ सप्टेंबर रोजी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर १५ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आंतरवली सराटी येथून मुंबईकडे कूच करण्यात येईल. या आंदोलनासाठी पाच दिवसांचे नियोजन करण्यात आले असून, मार्गातील विविध ठिकाणी आंदोलकांचे मुक्काम असतील.
*असा असेल मुंबईकडे जाण्याचा मार्ग*
१५ सप्टेंबर : आंतरवली सराटी येथून सकाळी १० वाजता प्रस्थान. पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे.
१६ सप्टेंबर : दुसरा मुक्काम अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे.
१७ सप्टेंबर : तिसरा मुक्काम पुणे शहरातील हडपसर येथे.
१८ सप्टेंबर : चौथा आणि शेवटचा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली किंवा कोपरखैरणे येथे.
१९ सप्टेंबरपासून : मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.
*‘लाखोंच्या संख्येने मुंबईला या’*
मराठा समाजातील जास्तीत जास्त बांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. गरीब मराठ्यांनी आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मुंबईच्या रस्त्यावर उतरावे, लाखोंच्या संख्येने वाहने घेऊन मुंबईकडे यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच एका आंदोलकाला जरी मारहाण झाली, तरी त्याचे तीव्र पडसाद उमटतील आणि संपूर्ण महाराष्ट्र बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला.
*महिलांनाही आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन*
या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन महिलांनी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विदर्भ आणि खानदेशातील मराठा समाजानेही आरक्षणाच्या या लढ्याला साथ द्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ तसेच जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यावरही टीका केली. मराठा आरक्षणाच्या लढाईतील हा निर्णायक टप्पा असून, आता मागे हटण्याचा प्रश्नच नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सर्व समाजाने सहभागी व्हावे, असे आवाहन करत जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे आता १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबई आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.










