आरंभ मराठी / कळंब
राज्य शासनाने २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांना नियमित करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी नगर परिषद कळंबकडून सुरू करण्यात आली असून, त्यामुळे शहरातील शेकडो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांना आता अधिकृत मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या निर्णयामुळे शहरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून नगर परिषदचे स्वागत करण्यात येत आहे. कळंब शहरातील बसस्थानकाच्या पाठीमागील परिसर, सरकारी दवाखान्यामागील भाग, कल्पना नगर पारधी वस्ती, जुने पोलीस स्टेशन समोरील परिसर, कळंब कन्या शाळेसमोरील भाग तसेच इतर अनेक वस्त्यांमधील रहिवाशांना या निर्णयाचा थेट लाभ होणार आहे. अनेक वर्षांपासून नागरिक अतिक्रमणाच्या भीतीत राहत होते.
मात्र शासनाच्या नव्या धोरणामुळे त्यांना आता कायदेशीर संरक्षण आणि मालकी हक्क मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नगर परिषद कळंबच्या नगराध्यक्षा सुनंदा शिवाजी कापसे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे.
नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा केला. शहरातील विविध भागांना भेटी देऊन त्यांनी अतिक्रमणधारक नागरिकांशी संवाद साधला आणि नियमितीकरण प्रक्रियेबाबत माहिती दिली. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांनी शासन निर्णयांचा सखोल अभ्यास करून नियमितीकरणासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे कामे वेगाने सुरू आहेत. नगर परिषद कर्मचारी नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करत असून अर्ज प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करत आहेत.
यासंदर्भात बोलताना नगराध्यक्ष यांनी सांगितले की, हा निर्णय नगर परिषद कळंबच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. सर्वसामान्य कुटुंबांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे. नगर परिषद प्रशासनाने पात्र नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. शासन नियमांनुसार पात्र लाभार्थ्यांना नियमितीकरणाचा लाभ दिला जाणार असून, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नगराध्यक्षा अतिक्रमणधारकांच्या दारी
नगराध्यक्षा सौ. सुनंदा कापसे यांनी शहरातील विविध भागांमध्ये जाऊन अतिक्रमणधारक नागरिकांच्या भेटी घेतल्या. नियमितीकरण प्रक्रियेची माहिती देत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. या निर्णयामुळे भविष्यात स्थैर्य मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. तसेच शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांनी नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शन करून सहकार्य केले.










