आरंभ मराठी / धाराशिव
BLO चे काम करून परतत असताना धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथे पेट्रोल पंपासमोर झालेल्या भीषण अपघातात एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत कनगरा (ता. धाराशिव) येथील रहिवासी तसेच बेंबळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले शिक्षक गोविंद इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झाला.
ही घटना घडल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून शिक्षकवर्गासह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. गोविंद इंगळे हे BLO चे काम पूर्ण करून आपल्या दुचाकीवरून परतत असताना हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की त्यामध्ये त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. दरम्यान, या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने बेंबळी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बेंबळी परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जम्पिंग निर्माण झाले असून त्यामुळे वाहनचालकांचा ताबा सुटून अपघात होत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी मागील चार वर्षांपासून सातत्याने तक्रारी आणि निवेदने दिली आहेत. धाराशिव–बेंबळी–उजनी या रस्त्याचे काम गेल्या सहा वर्षांपासून संथ गतीने सुरू असून रस्त्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या रस्त्यावर शेकडो अपघात झाले असून तब्बल १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे दीडशेहून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. वारंवार निवेदने देऊनही संबंधित विभागाने दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या अपघातानंतर तरी प्रशासनाने रस्त्यावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.








