आरंभ मराठी / धाराशिव
खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर कृषि विभागाने जिल्हाभरातील कृषि सेवा केंद्रांवर विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान विविध अनियमितता आढळून आल्याने एकूण १५ कृषि सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी एका केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे, तर १४ केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
कृषि विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्या. ई-पॉस मशीनवरील नोंदीप्रमाणे खताचा साठा न जुळणे, परवान्यात नमूद नसलेल्या स्त्रोतांमधून बियाणे व खतांची खरेदी-विक्री करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, शेतकऱ्यांना नियमानुसार पावती न देणे, खरेदीची बिले उपलब्ध नसणे, तसेच अनुदानित खत विक्रीसंबंधित अभिलेख अपूर्ण ठेवणे अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्या.
तालुकानिहाय पाहता धाराशिव व तुळजापूर येथील प्रत्येकी १, उमरगा येथील ४, भूम येथील ३, परंडा येथील २, कळंब येथील २ आणि वाशी तालुक्यातील २ अशा एकूण १५ केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कृषि विभागाने स्पष्ट केले आहे की, ही तपासणी मोहीम यापुढेही सुरू राहणार असून दोषी आढळणाऱ्या विक्रेत्यांवर बियाणे, खते व कीटकनाशके संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
जादा दराने विक्री, लिंकिंग, साठा रजिस्टर न ठेवणे, दरफलक न लावणे, अनधिकृत स्त्रोतांमधून खरेदी-विक्री, पावती न देणे किंवा परवान्यात नमूद नसलेल्या गोदामाचा वापर आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कृषि विभागाने शेतकऱ्यांना देखील महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. बियाणे, खते व कीटकनाशके खरेदी करताना अधिकृत परवानाधारक केंद्राची निवड करावी आणि प्रत्येक खरेदीवर पक्की पावती घ्यावी.
पावतीवर खरेदी केलेल्या वस्तूंचा तपशील व विक्रेत्याची स्वाक्षरी असल्याची खात्री करावी. अनुदानित खत घेताना ई-पॉस मशीनवरील बिल घेणे बंधनकारक असून खताच्या बॅगवरील किंमत आणि बिल यांची पडताळणी करावी. तसेच बियाणे खरेदी केल्यानंतर त्यावरील टॅग, पिशवी व थोडे बियाणे हंगाम संपेपर्यंत जतन करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बियाण्यांची पिशवी सिलबंद असल्याची खात्री करून अंतिम मुदत तपासावी आणि नामांकित कंपन्यांचीच उत्पादने खरेदी करावीत, असेही कृषि विभागाने स्पष्ट केले आहे.








