आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले असून, गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीचाच गळा दाबण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. शहरातील नागरिक राजू कुराडे यांनी हा गंभीर आरोप करत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू कुराडे हे दिनांक 17 मार्च रोजी सायंकाळी एका प्रकरणात फिर्याद दाखल करण्यासाठी शहर पोलीस ठाण्यात गेले होते. त्यांनी आपली तक्रार नोंदवून घेण्याची विनंती पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्याकडे केली. मात्र, यावेळी दराडे यांनी पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांचा गळा दाबल्याचा गंभीर आरोप कुराडे यांनी केला आहे.
या घटनेनंतर कुराडे यांनी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार घेत एमएलसी (मेडिको-लीगल केस) नोंदवली. त्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक रितू खोकर यांना निवेदन देऊन संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, यावर अपेक्षित कारवाई न झाल्याचा आरोप करत त्यांनी 6 एप्रिल रोजी लोकशाही दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार दाखल केली आहे. राजू कुराडे हे मनसेचे शहर उपाध्यक्ष असून, यापूर्वी इटळकर खून प्रकरणात त्यांनी शहर पोलीस ठाण्यावर गंभीर आरोप केले होते.
त्याचाच राग मनात ठेवून हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुराडे यांनी पोलीस स्टेशनचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास वास्तव परिस्थिती समोर येईल असेही सांगितले आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाण्याविरोधात मागील काही काळात विविध आरोप होत असल्याचेही समोर आले आहे. झिरो पोलिसांच्या माध्यमातून हप्तेखोरी, अवैध धंद्यांना प्रोत्साहन अशा गंभीर तक्रारी होत असून, त्याकडे वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
विशेष म्हणजे, दिनांक 16 मार्च रोजी पोलीस ठाण्यात एका कायम वादग्रस्त असलेल्या कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करताना दारूच्या बाटल्या आढळल्याचा प्रकारही समोर आला होता. यासंदर्भातील फोटो आणि बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर दराडे यांनी दारूवर केलेल्या कारवाईतील त्या बाटल्या असल्याचे वेळ मारून नेणारे स्पष्टीकरण दिले होते.
मात्र, या प्रकरणातही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने शहर पोलीस ठाणे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. आता फिर्याद देण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवरच अन्याय झाल्याचा आरोप समोर आल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस निरीक्षकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.








