आरंभ मराठी / धाराशिव
आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली. सुरुवातीला अजित पवार यांच्या संदर्भातील ज्या बातम्या येत होत्या त्यावर कोणाचाच विश्वास बसला नाही. मात्र, हा अपघात अचानकपणे आणि विचित्र पद्धतीने झाल्यामुळे यामध्ये अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची अंतिम यादी काल प्रसिद्ध झाल्यानंतर आजपासून उमेदवारांचा अधिकृतपणे प्रचार सुरू झाला आहे. याच प्रचारासाठी बारामती तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटामध्ये अजित पवार यांच्या जाहीर सभांचे आज आयोजन करण्यात आले होते.
काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर आज सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी VT SSK Jet 45XR या खाजगी विमानाने अजित पवार बारामतीच्या दिशेने निघाले होते. बारामती विमानतळाची धावपट्टी अगदी पाच मिनिटांवर आली असताना 8 वाजून 45 मिनिटांनी विमानाने बारामती विमानतळावर लँडिंग करण्यास सुरुवात केली. परंतु, विमानाने दोन गिरट्या हवेतच मारल्यानंतर विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला.
त्यामुळे हे विमान वेगाने खाली कोसळले. ज्या वेळेला विमान दोन वेळेला हवेतच घिरट्या मारत होते, त्यावेळेला विमानाचा आवाज नेहमीपेक्षा वेगळा आणि खूप मोठा येत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. विमान अगदी काही क्षणात खाली कोसळले आणि कोसळताच विमानाचा मोठा स्फोट होऊन विमानाने मोठा पेट घेतला.
विमानाने पेट घेतल्यानंतर आजूबाजूच्या शेतात असणारे नागरिक दुर्घटनास्थळाकडे धावले. मात्र, तिथे आग इतकी मोठी होती की तिथे तात्काळ बचाव कार्य करणे शक्य झाले नाही. स्थानिकांनी तात्काळ पोलीस स्टेशन आणि विमानतळाला ही बातमी कळवली. प्रशासनाची मदत येईपर्यंत आणि अग्निशमन गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत विमानात असणारे पाचही व्यक्ती मोठ्या प्रमाणात भाजले होते.
स्थानिकांनी गॉगल आणि घड्याळावरून अजित पवार यांचा भाजलेला मृतदेह ओळखला. या अपघातात उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश आहे. या पाचही व्यक्तींचा विमान अपघातामध्ये दुर्दैव मृत्यू झाला आहे.
जे खाजगी विमान अजित दादा घेऊन गेले होते, अशा विमानाचा हा दुसरा अपघात आहे. सध्या DGCA कडून विमान अपघात नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. अजित दादांच्या या अनाकलनीय मृत्यूमुळे राज्याच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. धाराशिव जिल्ह्याचे जावई असणारे अजित पवार यांचा धाराशिव जिल्ह्यासोबत नेहमीच स्नेह राहिलेला आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींकडून शोक व्यक्त केला जात आहे. अजितदादा यांच्या मृत्यूमुळे राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत. राजकारणातला दादा माणूस अकाली निघून गेल्यामुळे सामान्य नागरिकांपासून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. अजितदादा यांच्या पार्थिवावर बारामती तालुकातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सध्या त्याबद्दलची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी काही वेळात त्यांच्या कुटुंबीयांकडून या संदर्भात माहिती दिली जाईल. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी हे बारामतीच्या दिशेने निघाले आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे पवार कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदार यांना अश्रू अनावर होत असून सध्या सर्व पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. धाराशिव जिल्ह्यातूनही काही नागरिक बारामतीच्या दिशेने निघाले आहेत.









