आरंभ मराठी / धाराशिव
राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.15) दुपारी चार वाजता आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकांसाठी नामनिर्देशन पत्रे ऑफलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. यापूर्वी नगरपालिका निवडणुकांमध्ये ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला होता; मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या महानगरपालिका निवडणुकांमध्ये एकूण 3 कोटी 48 लाख 18 हजार 17 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जालना आणि इचलकरंजी या दोन ठिकाणी पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होत असून, त्यामुळे त्या शहरांतील नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. या निवडणुकांमधून एकूण 2869 नगरसेवक निवडले जाणार आहेत. यामध्ये 1442 जागा महिलांसाठी राखीव असून, अनुसूचित जातींसाठी 341, अनुसूचित जमातींसाठी 77 आणि ओबीसी प्रवर्गासाठी 759 जागांचा समावेश आहे. नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा महानगरपालिकेच्या वर्गवारीनुसार निश्चित करण्यात आली आहे.
अ वर्ग महानगरपालिकेसाठी 15 लाख रुपये, ब वर्गासाठी 13 लाख रुपये, क वर्गासाठी 11 लाख रुपये तर ड वर्ग महानगरपालिकेसाठी 9 लाख रुपये इतकी खर्चमर्यादा राहणार आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी खर्चावर काटेकोर नजर ठेवण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले. महानगरपालिका निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता सोमवार दिनांक 15 डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे.
या कालावधीत कोणत्याही प्रकारची आचारसंहिता भंग करणारी कृती आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच मतदारांना निर्भय वातावरणात मतदान करता यावे यासाठी आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय तयारी करण्यात येणार असल्याचेही नमूद करण्यात आले. निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर 2025 अशी आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी 31 डिसेंबर 2025 रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी 2026 आहे.
चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारी 2026 रोजी होणार असून, मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले असून, लोकशाहीची ही प्रक्रिया शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.









