आरंभ मराठी / धाराशिव
कळंब तालुक्यातील मौजे चोराखळी येथील महाकाली सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र अखेर महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत मंगळवारी (दि. १४) सकाळी सील केले. संबंधित केंद्र बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे तसेच न्यायालयीन व प्रशासकीय आदेशांचे उल्लंघन झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजाभाऊ सिताराम माळी (रा. चोराखळी, ता. कळंब) यांनी या कला केंद्रास परवानगी मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र संबंधित विभागांकडून आलेल्या अहवालांच्या आधारे दि. ७ फेब्रुवारी २०२३ रोजीचा अर्ज तहसील कार्यालयाने नामंजूर केला होता. याबाबत अधिकृत पत्राद्वारे माळी यांना पूर्वीच कळविण्यात आले होते.
दरम्यान, या निर्णयाविरोधात माळी यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे २०२४ मध्ये रिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर दिनांक २४ मे २०२४ रोजी न्यायालयाने काही अटींसह आदेश दिले होते. मात्र नंतर संबंधित अर्ज नामंजूर झाल्याने आणि अंतिम निर्णय येईपर्यंत केंद्र बंद ठेवण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. तरीही आदेशांचे उल्लंघन करत कला केंद्र सुरूच ठेवण्यात आले.
याशिवाय, या केंद्राशी संबंधित काही गुन्हे नोंद झाल्यामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली होती. पोलीस अधीक्षकांनी केंद्र कायमस्वरूपी बंद ठेवण्याची शिफारस केली होती. उपविभागीय दंडाधिकारी, कळंब यांनीही केंद्राची तपासणी करून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा अहवाल सादर केला होता. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा केंद्र बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही केंद्र सुरूच ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, या प्रकरणी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पुढील आदेश दिल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेत कारवाईचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी महसूल व पोलिस विभागाने संयुक्तपणे कारवाई करून संबंधित कला केंद्र सील केले. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी स्पष्ट इशारा देत, अनधिकृत व बेकायदेशीररित्या कोणतीही आस्थापना सुरू ठेवू नये.
अन्यथा संबंधितांवर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मागील काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील कलाकेंद्रावर गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना घडत असल्यामुळे कलाकेंद्र वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र, प्रशासनाकडून आता यावर धडक कारवाई करण्यात आली आहे.








