दिंडीतील वारकऱ्यांना वाटले जाणार होते कोल्ड्रिक्स
आरंभ मराठी / कळंब
संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त वाटपासाठी ठेवण्यात आलेल्या कोल्ड्रिंक्समधून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेत दोन परिचारिकांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई व लातूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सुदैवाने हा प्रकार वेळेत निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला.
संत गजानन महाराज यांच्या पालखीचे रविवारी कळंब शहरात आगमन झाले. पालखीतील भाविकांसाठी विविध सेवाभावी संस्थांकडून अन्नदान, पिण्याचे पाणी तसेच कोल्ड्रिंक्सचे वाटप करण्यात येणार होते. मात्र, वाटपापूर्वीच दोन परिचारिकांची प्रकृती बिघडल्याने संबंधित कोल्ड्रिंक्सचे वितरण तातडीने थांबविण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांची वापर मर्यादा (एक्सपायरी) संपलेली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, विषबाधेचे नेमके कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
प्रशासनाने संबंधित कोल्ड्रिंक्सचा साठा जप्त करून पुढील चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेमुळे पालखी सोहळ्यातील भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अन्न व पेयपदार्थांचे वाटप करताना अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.










