सोयाबीन खरेदीच्या निकषावर मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल, आमदार कैलास पाटील यांचा फडणवीस यांना सल्ला
आरंभ मराठी / धाराशिव
सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीनमध्ये आर्द्रता प्रमाण 15% पर्यंत असले तरी सोयाबीन खरेदी करत आहोत,अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. वास्तविक मुख्यमंत्री सांगतात तशी परिस्थिती नसून, धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी वेगवेगळ्या खरेदी केंद्रावर जाऊन माहिती घेतली असता बारा टक्केपर्यंत आर्द्रता असेल तरच सोयाबीनची खरेदी केली जात आहे.त्यामुळे आमदार कैलास पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिशाभूल न करण्याचा सल्ला दिला आहे.
तोच तो कित्ता गिरवू नका,
कैलास पाटील यांचा सल्ला
आपण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा विराजमान झालात याबद्दल प्रथमत: आपले मनःपूर्वक अभिनंदन!
मागच्या सरकारमध्येही आपण मुख्य होतात. तेव्हा अनेक खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली गेली. आता आपल्या नेतृत्वाखालील सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा सर्वांना लागून आहे. मात्र, आपणही पुन्हा तोच कित्ता गिरवत आहात, असे दिसते.
आपण आजच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोयाबीन खरेदीचा मुद्दा सांगितला. आर्द्रतेचा निकष १२ टक्के होता. तो शेतकरी हित लक्षात घेऊन वाढवला व १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीनही हमीभाव केंद्रावरून विकत घेत आहात व त्यामुळे विक्रमी खरेदी झाल्याचे आपण म्हटले आहे. पण, त्याची एकदा पडताळणी करायला हवी होती. केंद्रावरील वास्तव आपण म्हणता त्यापेक्षा वेगळे आहे.
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील एकाही हमीभाव केंद्रावरून १५ टक्के आर्द्रता असणारे सोयाबीन खरेदी केले गेले नाही, आजही करीत नाहीत. आपण स्वतः काही केंद्रांना भेटी देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आहे. त्यामुळे हे वास्तव आपणास अवगत करून देणे आवश्यक वाटते. नव्या सरकारची सुरुवातच अशा थापानी होणार असेल तर पुढे शेतकऱ्यांनी आपल्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवावी, हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे जमिनीवर या, वास्तव पहा अन् मगच बोला..
शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा फसवू नका, जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात आणू नका, अशी विनंती आमदार कैलास पाटील यांनी केली आहे.