आरंभ मराठी / धाराशिव
गणेशोत्सवाच्या उत्साहावर धाराशिव शहरातील अर्धवट रस्ते आणि नालीच्या कामांचे विघ्न आले आहे. वर्षभरापासून सुरू असलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण नसल्याने गणेश मंडळांना बाप्पांच्या आगमन आणि विसर्जन मिरवणुकीसाठी खड्डे, उंच-सखल नाल्या आणि धोकादायक उतारांचा सामना करावा लागणार आहे. गेल्यावर्षीचीच परिस्थिती यंदाही कायम राहिल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान, मुंबईत आठवडाभरात श्री.गणेशाच्या आगमनावेळी दोन दुर्घटना घडल्या, धाराशिवचे झोपलेले,सुस्तावलेले प्रशासन अशाच दुर्घटनांची वाट पाहत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिजाऊ चौक ते संत गाडगे महाराज चौक आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या मार्गावर काही ठिकाणी रस्त्याचे काम झाले असले तरी अनेक ठिकाणी काम अपूर्ण आहे. नालीसाठी खोदलेले खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. संत गाडगे महाराज चौक ते जिल्हाधिकारी बंगला या मार्गावरही रस्त्यालगत नालीसाठी खोदलेले खड्डे धोकादायक आहेत.विशेष म्हणजे बाप्पांच्या स्वागतासाठी तसेच निरोपासाठी हा मार्ग महत्त्वाचा आहे. जिल्हाधिकारी बंगल्यासमोर सिमेंट रस्ता संपताना निर्माण झालेला मोठा उतारही मिरवणुकीतील वाहनांसाठी अडचणीचा ठरू शकतो.
जिजाऊ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्याच्या कामाला ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सुरुवात झाली. कामाला जवळपास वर्ष होत आले तरी रस्त्याच्या दोन्ही बाजू पूर्ण झालेल्या नाहीत. काही ठिकाणी सिमेंट रस्त्याला तडे गेल्याचेही दिसून आले. त्यामुळे कामाच्या दर्जासोबतच कामाच्या गतीवरही प्रश्न उपस्थित होत असताना ठेकेदारावर कोणतीही कारवाई झाली नाही.
सध्या नालीचे काम सुरू असून काही ठिकाणी नाली रस्त्यापेक्षा उंच तर काही ठिकाणी खाली आहे. नालीच्या कामावर नियमित पाणी मारले जात नसल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहेत.
_
पाऊस नाही, तरी कामे संथ, सादरीकरण कसे करणार ?
गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पाऊस नसल्याने रस्ते आणि नालीची कामे वेगाने पूर्ण करण्याची संधी होती. मात्र गणेशोत्सव आला तरी मिरवणूक मार्गांवरील कामे अपूर्णच आहेत. दोन-दोन महिन्यांपासून सादरीकरणाची तयारी करणाऱ्या गणेश मंडळांना आता मिरवणुकीच्या मार्गावरील अडथळ्यांचीही चिंता आहे.










