१८६५ कोटींच्या आराखड्याला गती मिळणार
आरंभ मराठी / मुंबई
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मंत्रालयात या संदर्भात आज आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार राणाजगजीतसिंह पाटील, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदाळकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाने सुमारे १८६५ कोटी रुपयांच्या श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. त्यापैकी ४२१ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विकास कामांमुळे बाधित होणाऱ्या १०५ खाजगी मालमत्तांपैकी सुमारे ७५ टक्के मालमत्ता धारकांशी शासनाने यशस्वी वाटाघाटी केल्या आहेत. त्यामुळे उर्वरित विकास कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर, तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यांतर्गत विविध कामांचे भूमिपूजन मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर तुळजाभवानी मंदिर परिसराचा विकास भव्य व दिव्य स्वरूपात व्हावा, यासाठी वेळेचे काटेकोर पालन करून नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीत रामदरा तलावाजवळ विकसित होणाऱ्या शिवसृष्टी उद्यानाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तसेच मंदिर परिसरातील आठ जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार आणि आठ कुंडांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. याशिवाय पार्किंग प्लाझा, प्रमुख रस्त्यांचे सुशोभीकरण, भक्तनिवास आणि दर्शन मंडप यांसारख्या कामांबाबतही आवश्यक सूचना देण्यात आल्या. तुळजापूर शहराचा वेगाने विस्तार होत असल्याने शहरासाठी स्वतंत्र ‘मास्टर प्लॅन’ तयार करून सुनियोजित विकास साधण्याच्या सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. या कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत समिती स्थापन करण्याचे निर्देश –
छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांविषयी समाजात नितांत आदर आहे. त्यांच्या प्रेरणादायी स्मारकांची उभारणी व्हावी, मात्र काही ठिकाणी शासनाचे निकष न पाळता अनधिकृतपणे पुतळे उभारले जात असून त्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर, अशा प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन करावी आणि इच्छुकांना शासनाने निर्धारित केलेल्या निकषांनुसार पुतळे उभारण्यासाठी मार्गदर्शन करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे सामाजिक सलोखा अबाधित राहील आणि महापुरुषांचा सन्मानही राखला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्यासोबतच मुख्यमंत्री शेतकरी सौर पंप योजना, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग, नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना तसेच जलजीवन मिशनअंतर्गत पाणीटंचाई या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत संबंधित विभागांनी आपल्या कामकाजाचा अद्ययावत आढावा सादर केला. तसेच बैठकीनंतर तात्काळ कार्यवाही अहवाल सादर करण्याचे आदेशही मंत्री सरनाईक यांनी दिले.








