आरंभ मराठी / धाराशिव
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना पाण्याअभावी वन्यजीवांचे हाल होऊ नयेत यासाठी धाराशिव तालुक्यातील पळसप परिसरात वन विभागाने पुढाकार घेत पाणवठ्यावर नियमित पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.त्यामुळे वन्य प्राण्यांना दिलासा मिळत आहे.पाणवठ्यावरील पाणी पितानाचे क्षण ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
उन्हामुळे नैसर्गिक जलस्रोत आटत चाललेल्या या काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत वन्यजीवांना मोठा दिलासा देण्याचे काम करण्यात येत आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील हरण, ससे, माकडे तसेच इतर लहान-मोठे वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करण्यापासून वाचत असून त्यांना सुरक्षित वातावरणात पाणी उपलब्ध होत आहे. पाण्याच्या शोधात होणारे स्थलांतर आणि त्यातून उद्भवणारे धोके काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
विभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पचरंडे, वन परिमंडळ अधिकारी मुदाळे तसेच वनरक्षक ससाने,माने, चव्हाण, सुतार यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.पळसप, जगजी, वरवंटी, घाटंग्री, सोनेगाव आदी भागात अशा पद्धतीने पाणवठे सुरू करण्यात आले आहेत.
स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींकडून या उपक्रमाचे कौतुक होत असून भविष्यातही अशा प्रकारे वन्यजीवांसाठी पाण्याची व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था सातत्याने करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून पर्यावरण संतुलन राखण्यासही याचा मोठा हातभार लागणार आहे.









