ठाकरे गटाचे दोन्ही आमदार उपस्थित, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयोजित केली महत्वाची बैठक
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा नियोजन समितीच्या कामांना दिलेल्या स्थगितीमुळे महायुतीत ठिणगी पडली आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यातील विस्तव जात नसल्याचे दिसत आहे. आज मुंबई येथे मंत्रालयात पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी श्रीक्षेत्र तुळजाभवानी मंदिराच्या विकास आराखड्याच्या मुद्द्यावर बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीस पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह आमदार कैलास पाटील आणि आमदार प्रवीण स्वामी उपस्थित आहेत. मात्र या बैठकीला तुळजापूरचे आमदार आणि ‘मित्र’चे उपाध्यक्ष राणा पाटील यांनी दांडी मारल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
तब्बल १ हजार ८०० कोटींचा तुळजापूर मंदिर विकास आराखडा राबवताना भाजपा आणि शिवसेना यांच्यातील दरी रुंदावत चालली असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटींच्या कामांना दिलेली स्थगिती आणि धाराशिव शहरातील 140 कोटींच्या रस्त्यांची काढलेली फेरनिविदा यांमुळे आमदार राणा पाटील आणि पालकमंत्री सरनाईक यांच्यात मतभेद झाले आहेत.
तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांना देखील आता तुळजापूर मधील शिवसेना विरोध करत असून, काल पत्रकार परिषद घेऊन भाजपावर शिवसेनेचे आरोप केले आहेत. तर शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तक्रारी दिल्या आहेत.
तुळजाभवानी मातेचे छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार अर्पण करतानाचे १०८ फुटी शिल्प अष्टभुजा असावे की द्विभुजा असावे यावरूनही नवीन वाद उद्भवला आहेत. त्यातच पालकमंत्री सरनाईक यांनी आयोजित केलेल्या बैठकीला आमदार राणा पाटील यांनी दांडी मारल्यामुळे हा वाद पुढेही वाढतच जाईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल १८०० कोटी रुपयांचा विकास आराखडा राबवताना महायुतीतील प्रमुख दोन पक्षातच जुंपल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा पार पाडायच्या असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.