आरंभ मराठी / लोहारा
७० प्रवासी घेऊन जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्यामुळे लोहारा शहराजवळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे.
बसवकल्याण – तुळजापूर एसटी बसने अचानक पेट घेतला.
याप्रसंगी चालकाच्या सर्तकतेमुळे बसमधील ७० प्रवाशी बाल बाल बचावले. ही घटना लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेटवर शुक्रवारी (दि.१४) सकाळी पावणे नऊ वाजता घडली. तुळजापूर आगाराची एसटी बस (MH 20 BL 2092) रोज दुपारी साडेतीन वाजता तुळजापुरहून लोहारामार्गे बसवकल्याणला मुक्कामी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता बसवकल्याणहून ही बस परत लोहारा मार्गे तुळजापूरला जाते.
शुक्रवारी सकाळी सहा वाजता ही एसटी बस बसवकल्याणहून निघाली. सकाळी पावणे नऊच्या सुमारास लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या गेट समोर प्रवासी उतरण्यासाठी व चढण्यासाठी बस थांबली होती. याप्रसंगी प्रवासी गाडीत बसल्यानंतर बस चालक एम. व्ही. घंटे यांनी बस सुरू करताच बसच्या केबिनमधून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चालक घंटे यांनी प्रवाशांना तात्काळ खाली उतरण्यास
सांगितले. त्यातच बसच्या केबिनमध्ये जाळ लागला. सर्व प्रवासी आरडाओरडा करत बसच्या बाहेर पडले. बसमध्ये महिला, वृद्ध आणि लहान बाळांची संख्या जास्त होती. त्यातच बसमध्ये मोठ्या प्रमाणात धूर झाल्यामुळे बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नव्हता. काही प्रवाशांनी बसच्या खिडकीतून उड्या मारून जीव वाचवला.
बऱ्याच प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी सामान बसमध्येच ठेवले. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाला तात्काळ पाचारण करत आगीवर नियंत्रण आणले आहे. यानिमित्ताने जुन्या, खिळखिळ्या झालेल्या एसटी बसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी तात्काळ याप्रश्नी लक्ष घालून एसटी बसचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी प्रवाशांसह एसटीचे कर्मचारी देखील करू लागले आहेत.