महायुतीचे दोन आमदार, आमदार राणा पाटील तसेच डॉ.तानाजी सावंत यांनाही मंत्रिपद नाकारले
आरंभ मराठी / धाराशिव
महायुतीच्या नवीन सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद न मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या वाट्याला पुन्हा एकदा निराशा आली असून, गेल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आलेल्या डॉ.तानाजी सावंत यांनाही यावेळी मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आल्याने जिल्ह्याच्या विकासाचा गाडा अर्थात पालकमंत्रीपद अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांच्या खांद्यावर दिले जाणार हे आता निश्चित झाले आहे.
जिल्ह्यातील चारपैकी तुळजापूर आणि परंडा या दोन मतदारसंघातून महायुतीचे दोन आमदार निवडून आले आहेत. तुळजापूरमधून निवडून आलेले आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपचे जिल्ह्यातील एकमेव आमदार असून, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल,असा विश्वास कार्यकर्त्यांना होता. मात्र त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. आमदार राणा पाटील यांनी जिल्ह्यातील भाजप वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा भाजपने तुळजापूरची जागा मिळवली आहे. त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे.
डॉ.सावंत यांनाही मंत्रिपद नाकारले
भूम- परंडा मतदारसंघाचे आमदार डॉ.तानाजी सावंत हे शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांपैकी आहेत. तसेच ते मागच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होते. मात्र भाजपच्या विरोधामुळे त्यांना यावेळी मंत्रिपद नाकारण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मागच्या मंत्रिमंडळात डॉ. सावंत यांच्या माध्यमातून जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले होते. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद त्यांच्याकडेच होते. यावेळी मात्र, त्यांनाही मंत्रिपद मिळाले नाही,त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांच्या खांद्यावर दिले जाणार हे निश्चित झाले आहे.
बीड जिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकत्व ?
जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अन्य जिल्ह्यातील मंत्र्यांकडे जाणार आहे. बीड जिल्ह्यातील धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहिण – भावाला मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे शेजारचा जिल्हा म्हणून दोघांपैकी एकाकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकत्व दिले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.