लाडूचा हट्ट कशासाठी, देवी भक्तांना पेढ्याचा प्रसाद का नाही ?
_
पेढ्यामुळे मिळेल जिल्ह्यातील दुग्ध उत्पादक शेतकरी, स्थानिक व्यावसायिकांना रोजगार
_
पुण्यातील चितळेंच्या लाडूसाठी हट्ट कुणाचा ?
चंद्रसेन देशमुख /आरंभ मराठी
धाराशिव ; कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या भाविकांना प्रसाद म्हणून पुण्यातील चितळेंचे लाडू देण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानने घेतला आहे. वास्तविक पाहता धाराशिव जिल्ह्यातील खवा आणि पेढे देशभरातील देवस्थानांमध्ये प्रसिद्ध असताना तुळजाभवानी मंदिरात पेढ्याऐवजी लाडूचा हट्ट कशासाठी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जिल्ह्यात दुग्ध आणि खवा उत्पादन मोठ्या प्रमाणात असताना तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, व्यावसायिकांना रोजगार वाढवणे शक्य असताना मंदिर संस्थानने पेढ्याऐवजी लाडूचा हट्ट कशासाठी धरला, अशी विचारणा होत आहे.
जिल्ह्यातील कुंथलगिरीचा पेढा देशात सर्वदूर पोहोचला आहे. या भागातील खवा आणि पेढ्याने भारतातील प्रत्येक देवस्थानातील बाजारपेठ काबीज केली आहे. चविष्ट खवा आणि पेढ्याने विशेषतः भूम- वाशी तालुक्याचे नाव सर्वत्र पोहोचवले असून,बहुतांश देवस्थानांकडून प्रसाद म्हणून याच भागातील खवा आणि पेढ्याचा उपयोग केला जातो.
केवळ भूम,वाशी तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात तयार केलेला खवा व्यापाऱ्यांच्या माध्यमातून मुंबई, पुण्यासह वेगवेगळ्या महानगरात पाठवला जातो.उत्पादनात अग्रेसर असलेल्या जिल्ह्यात खवा क्लस्टर होत आहे. सरकारही या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहे.
यामुळे अनेक शेतकऱ्याना जोडव्यवसायातून आर्थिक मदत होत आहे एवढेच नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांना देखील आर्थिक लाभ मिळत आहे. असे असताना तुळजाभवानी मंदिरात पेढ्याऐवजी लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयावर मतभिन्नता निर्माण झाली आहे. स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करण्याऐवजी मंदिर संस्थानने लाडूचा हट्ट कशासाठी धरला आहे,असा सवाल विचारला जात आहे.
मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना पुण्यातील चितळेंचे लाडू देण्यात येणार आहेत. त्यासाठी मंदिर संस्थान खर्च करणार आहे. वास्तविक पेढ्याऐवजी लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेतला तर स्थानिक दुग्ध उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांना आर्थिक हातभार लागू शकतो. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार देखील मिळू शकतो.
मात्र,मंदिर संस्थानने लाडूचा हट्ट धरल्यास भाविकांच्या खिशातील पैसा जिल्ह्याबाहेर जाऊन रोजगाराच्या संधी बुडतील.कारण चितळे यांच्याकडून पुण्यातच लाडू तयार करण्यात येणार आहेत. मंदिर संस्थानने लाडूचा हट्ट सोडावा आणि भाविकांना पेढ्याचा प्रसाद देण्याचा निर्णय घ्यावा,अशी मागणी करण्यात येत आहे.
उपवासाला लाडू नव्हे, पेढ्याचा प्रसाद हवा,
तुळजाभवानी मातेचे बहुतांश भाविक नवरात्रोत्सवात तसेच मंगळवार,शुक्रवार आणि पौर्णिमेला उपवास धरतात. मात्र, उपवासाला डाळीच्या पिठाचे लाडू प्रसाद म्हणून सेवन करता येत नाहीत. पेढ्याचा प्रसाद उपवासादिवशी सेवन करता येतो.त्यामुळे पेढ्याचा प्रसाद कोणत्याही दिवशी चालू शकतो. मंदिर संस्थानने लाडूचा प्रसाद देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी स्थानिक पातळीवर पुजारी, व्यापारी आणि नागरिकांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
आपल्या भागाची ओळख वाढवा, लाडू नको पेढ्याचा प्रसाद हवा,
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने प्रसाद म्हणून लाडू देण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. कोणत्या तरी मंदिरातील कॉपी करण्यापेक्षा आपण आपली स्वतंत्र ओळख निर्माण करायला हवी. पेढा उत्पादन ही धाराशिव जिल्ह्याची ओळख आहे.ती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे. त्यासाठी मंदिर संस्थानने पुढाकार घ्यावा. लाडूऐवजी भाविकांना पेढ्याचा प्रसाद दिल्यास स्थानिक नागरिकांना रोजगार मिळेल आणि आपला जिल्हा करत असलेल्या उत्पादनाचा देशभर लौकिक वाढेल.
-नागनाथ भांजी,
पुजारी,तुळजापूर