आरंभ मराठी / जालना
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत तब्बल दहा वेळा आमरण उपोषण केले असून या उपोषणांचा एकूण कालावधी ८१ दिवसांचा आहे. आता २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले त्यांचे आंदोलन हे ११वे उपोषण आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचा जरांगे यांचा उपोषणाचा संघर्ष पुन्हा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.दरम्यान त्यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान पहिले उपोषण केले. हे उपोषण १७ दिवस चालले. त्यानंतर २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२३ या काळात दुसरे उपोषण नऊ दिवस सुरू होते. २६ व २७ जानेवारी २०२४ रोजी नवी मुंबईत तिसरे उपोषण झाले. त्यानंतर १० ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान अंतरवाली सराटीत चौथे उपोषण १७ दिवस चालले. हे त्यांच्या आतापर्यंतच्या उपोषणांपैकी सर्वाधिक कालावधीचे उपोषण ठरले.
यानंतर ८ ते १३ जून २०२४ दरम्यान सहा दिवसांचे पाचवे, २० ते २४ जुलै २०२४ दरम्यान पाच दिवसांचे सहावे आणि १७ ते २५ सप्टेंबर २०२४ दरम्यान नऊ दिवसांचे सातवे उपोषण झाले. २५ ते ३० जानेवारी २०२५ दरम्यान त्यांनी आठवे उपोषण केले. हे सहा दिवस चालले. २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२५ दरम्यान मुंबईतील आझाद मैदानात पाच दिवसांचे नववे उपोषण झाले. त्यानंतर ३० मे २०२६ रोजी सुरू केलेले दहावे उपोषण सुमारे १५ तास चालले. सरकारकडून मागण्यांवर कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्यानंतर ते स्थगित करण्यात आले.
या दहा उपोषणांनंतर आता जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट २०२६ रोजी अंतरवाली सराटीत ११व्या आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आज ६ सप्टेंबर रोजी या आंदोलनाचा नववा दिवस आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर ठोस निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. दरम्यान, सरकारकडून चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असून राज्याचे लक्ष आता अंतरवाली सराटीकडे लागले आहे.










