आरंभ मराठी | धाराशिव
महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आज (दि.२७) धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध शासकीय, सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या महत्त्वाकांक्षी ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ कार्यक्रमासह विविध विभागांच्या आढावा बैठका, वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आणि स्थानिक भेटी असा त्यांचा दिवसभराचा व्यस्त दौरा राहणार आहे. या दौऱ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे जिल्हा परिषदेतर्फे सादर करण्यात येणारे ‘व्हिजन २०३०’. या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील सुमारे ७०० गावांच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. या आराखड्यात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, बालविकास, ग्रामविकास आणि शाश्वत विकास या महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी केली आहे. शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मैदानावर होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री ग्राम समृद्धी योजनेच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ होणार असून, ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय आणि आगामी योजनांबाबत मंत्री गोरे मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यात धाराशिव जिल्ह्यासाठी विशेष घोषणा होणार का, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
दौऱ्यानुसार सकाळी १०.१५ वाजता तामलवाडी येथे आगमन करून ते शासकीय सत्कार समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर १०.५० वाजता अपसिंगा येथे वारकरी संप्रदायाच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात सहभागी होतील.
यानंतर ११.३० वाजता धाराशिव येथे जिल्हा परिषद कन्या शाळेत आयोजित ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ कार्यक्रमाला उपस्थित राहतील. दुपारी १२.२० वाजता शिंगोली येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीस उपस्थित राहून, दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेत विविध विभागांच्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.
त्यानंतर दुपारी २.१० वाजता महात्मा फुले चौकात महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून ते सिद्धेश्वर वडगाव येथे भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधतील.
दौरा पूर्ण करून मंत्री जयकुमार गोरे सायंकाळी सोलापूरकडे रवाना होणार असून तेथून रात्री रेल्वेने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि संबंधित विभागांनी सर्व तयारी पूर्ण केली असून, विशेषतः ‘व्हिजन २०३०’ कार्यक्रम आणि विभागीय आढावा बैठकींमधून धाराशिवच्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी धाराशिव जिल्हा परिषदेने तयार केलेल्या ‘आपला जीव धाराशिव’ या विशेष गीताचे प्रदर्शन होणार आहे.








