दोन दशकांपासून सुरू असलेल्या खटल्याचा शेवट कधी?
आरंभ मराठी/
मुंबई/धाराशिव :
राज्याच्या राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातील निकालासाठी आता २० जूनची प्रतीक्षा लागली आहे. तब्बल २० वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात विशेष सीबीआय न्यायालयाने यापूर्वी १४ मे २०२६ रोजी निकाल जाहीर करण्याचे संकेत दिले होते.
मात्र त्यानंतर निकालाची तारीख १६ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली. १६ जून रोजीही निकाल न लागल्याने न्यायालयाने आता २० जून ही नवी तारीख निश्चित केली आहे.
पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या कारचा चालक समद काझी यांची ३ जून २००६ रोजी नवी मुंबई येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.
त्यानंतर प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. तपासादरम्यान अनेक आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह इतर आरोपींवर कट रचल्याचा आरोप आहे.
या खटल्यात गेल्या दोन दशकांत १२८ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. सुनावणीदरम्यान विविध याचिका, प्रक्रियात्मक अडथळे, न्यायालयीन आदेश आणि इतर कारणांमुळे खटल्याची सुनावणी अनेकदा लांबली. त्यामुळे हा खटला महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चित गुन्हेगारी खटल्यांपैकी एक ठरला आहे.
अंतिम युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर सलग दोन वेळा निकालाची तारीख पुढे गेल्याने पीडित कुटुंबीय, समर्थक आणि संपूर्ण राज्याचे लक्ष आता २० जूनकडे लागले आहे. दोन दशकांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.









